शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ या विषयी जनजागृतीची आवश्यकता असून या कायद्याची भूमिका व महत्व सर्वांनी समजून घ्यावे असे मत एव्हीके लॉ असोसिएट्स एलएलपी संस्थेच्या वरिष्ठ विधीज्ञ अॅड. पल्लवी थत्ते यांनी व्यक्त केले. इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएमएस) च्या वतीने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, सध्याची परिस्थिती पाहता सर्वच क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. महिला आता फक्त मुलगी, सून, पत्नी, माता चौकटीत न राहता स्वावलंबी बनत आहेत. त्या आता अधिकारी, वैज्ञानिक, मनुष्यबळ व्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राध्यापक, संचालक अशा विविध रूपांनी कार्यरत असल्याचे दिसून येते. हे सगळे खरे असले तरी आजही अनेक ठिकाणी महिलांना खऱ्या अर्थाने समानतेची वागणूक मिळत नाही हे कटू सत्य आहे.अधिकारांच्या अनेक संधी तिची पात्रता असून सुद्धा केवळ ती महिला आहे म्हणून नाकारल्या जातात तसेच अनेक ठिकाणी नोकरदार महिलांची कामाच्या ठिकाणी लैंगिक छळवणूक होत असल्याचे प्रकार समोर आले आहेत. स्त्रीच्या मनाविरुद्ध केलेला कोणताही शारीरीक जवळिकीचा प्रयत्न ‘लैगिक शोषण’ या सदरात मोडतो. अशा घटनांना आळा घालावा यासाठीच कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३ अर्थात पॉश कायदा अस्तित्वात आला. हा कायदा आधी ‘विशाखा आदेश’ या नावाने प्रचलित होता.या कायद्यात लैंगिक छळ म्हणजे काय याची विस्तृत व्याख्या करण्यात आली आहे.
शारीरिक स्पर्श, लैंगिक संबंधाची मागणी, लैंगिक शेरेबाजी, अश्लील चित्र- पुस्तके दाखवणे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे शारीरिक, शाब्दिक, अशाब्दिक प्रकारातील लैंगिक स्वरूपाचे अस्वागतार्ह वर्तन याला कायदा ‘लैंगिक छळ’ म्हणतो. या प्रकारचे सगळेच वर्तन लैंगिक छळात बसते. हे नोकरी व व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांनी लक्षात घ्यायला हवे आणि सावध राहायला हवे. कामाच्या ठिकाणचा लैंगिक छळ महिलेच्या प्रगतीतील अडथळा असून त्याचा कौटुंबिक, व्यावसायिक आयुष्यावर परिणाम होऊ शकतो असे सांगत अॅड. पल्लवी थत्ते यांनी या कायद्याची सविस्तर माहिती विविध उदाहरणे देत सांगितली.या कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना आयआयएमएसचे संचालक डॉ.शिवाजी मुंढे यांनी सांगितले की,महिलांसाठी कामाचे ठिकाण सुरक्षित आणि लैंगिक छळमुक्त असायलाच हवे, यासाठी जनजागृतीचा एक भाग म्हणून या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृता तेंडुलकर यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. अमर गुप्ता यांनी केले.