शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१० फेब्रुवारी) :- रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांना सन्मानपुर्वक आठवड्याची हक्काची रजा मिळवून दिली त्यामुळे त्यांना कामगार चळवळीचे जनक म्हणतात असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष आणि कामगार नेते डॉ. कैलास कदम यांनी केले.
कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त खराळवाडी पिंपरी येथे लोखंडे यांच्या प्रतिमेस डॉ. कदम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक सद्गुरु कदम, शहर महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सायली नढे, शहर युवक कॉंग्रेस अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, महाराष्ट्र प्रदेश एनएसयूआयचे उपाध्यक्ष ॲड. उमेश खंदारे, हिंद कामगार संघटनेचे सरचिटणीस यशवंत सुपेकर, उपाध्यक्ष शांताराम कदम, खजिनदार सचिन कदम, समन्वयक पुनम येरुणकर तसेच ज्येष्ठ नेत्या सरिता जामनिक, दिनकर भालेकर, उमेश बनसोडे, तारिक अख्तर, सतिश भोसले, सौरभ शिंदे, विरेंद्र गायकवाड, स्वप्निल बनसोडे, हिरा जाधव, इस्माईल संगम, हरीश डोळस, भास्कर नारखेडे, पांडूरंग जगताप, विजय ओव्हाळ, बाबा बनसोडे, आबा खराडे, माऊली मलशेट्टी, विश्वनाथ जगताप, झेव्हीयर ॲन्थोनी, जुबेर खान, निखिल भोईर, स्वाती शिंदे, भारती घाग आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. कदम यांनी सांगितले की, खेड तालुक्यातील कन्हेरसर गावात शेतकरी कुटूंबात रावबहादूर लोखंडे यांचा जन्म झाला. माध्यमिक शिक्षण पुर्ण करुन नोकरी व्यवसायासाठी त्यांनी मुंबई गाठली. सुरुवातीला रेल्वे खात्यात कारकुनाची नोकरी केली. नंतर कापड गिरणीत कामाला लागले. यावेळी त्यांच्या लक्षात आले की, येथिल कामगार मालक वर्गाच्या दबावाखाली सुट्टी न घेता तेरा, चौदा तास काम करीत असत. कामगारांच्या होणाऱ्या हालपेष्ठा पाहुन ते व्यथित झाले. १८८४ साली त्यांनी पाच हजारांहून जास्त कामगारांची परिषद मुंबईत भरविली. तत्कालीन कामगार आयोगाला कामगार कायद्यात सुधारणा करण्याची मागणी केली. यानंतर १८९० साली मुंबईत देशातील पहिली कामगारांची ‘बॉम्बे मिल हँड्स असोशिएशन’ या संघटनेची स्थापना केली. कामगारांचे संघटन उभारुन वेळप्रसंगी असहकार, संप, उपोषण, आंदोलन करुन त्यांनी कामगारांना १० जून १८९० पासून रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळवून दिली.
रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे हे सत्यशोधक समाजाचे पुरस्कर्ते आणि महात्मा फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष होते. ब्रिटीशांनी केलेल्या कामगार कायद्यात लोखंडे यांच्या सुचनांची दखल घेण्यात आली. त्याचा कामगार कायद्याविषयी अभ्यास पाहुण ब्रिटीश सरकारने त्यांचा सन्मानपुर्वक किताब दिला. १८९३ – ९४ साली मुंबईत उसळलेली दंगल मिटविण्यासाठी त्यांनी केलेले काम पाहून ब्रिटीश सरकारने त्यांना ‘रावबहादूर’ ही पदवी बहाल केली. ते परखड वक्ते, झुंजार लेखक होते. त्यांनी १८८० साली सत्यशोधक समाजाचे पहिले मुखपत्र ‘दीनबंधू’ मुंबईत सुरु केले. यानंतर पंचदर्पण हे पुस्तक आणि गुराखी हे दैनिक काढले. आपल्या लेखणीतून त्यांनी सक्तीचे शिक्षण, दारुबंदी विद्यार्थ्यांना सवलती, शेतक-यांच्या समस्या या विषयी जनजागृती केली. प्लेगच्या साथीचा सामना करण्यासाठी त्यांनी मुंबईत मराठा हॉस्पिटलची स्थापना केली. कामगार चळवळीचे जनक रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांना रुग्णांची सेवा करीत असताना प्लेगने गाठले आणि ९ फेब्रुवारी १८९७ साली ठाण्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.