वन वणवे प्रतिबंधासाठी लोकसहभाग महत्त्वाचा- प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण
शबनम न्यूज : पुणे (दि.२२ एप्रिल २२ ) :- वन वणवा लागल्याने जंगल, वन्यजीव आदी जैवविविधतेचे नुकसान होण्यासह परिसरातील शेतीचेही प्रचंड नुकसान होते. वने नष्ट झाल्यामुळे वन्यजीव शेजारील शेतीकडे वळल्याने मोठ्या प्रमाणात नासधूस होते. त्यामुळे वणवे लागू नयेत यासाठी तसेच वणवे विझवण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून पुढे येत वनकर्मचाऱ्यांना मदत करावी, असे आवाहन वनविभागाचे पुणे प्रादेशिक मुख्य वनसंरक्षक एन. आर. प्रवीण यांनी केले.
जिल्ह्यात लागणाऱ्या वन वणव्यांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर यासंबंधी उपाययोजनाबाबत पुणे वन विभागाच्यावतीने दूरदृष्य प्रणालीद्वारे ‘वन वणवा परिषद- २०२२’ चे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री. प्रवीण बोलत होते. या परिषदेत मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य वन संरक्षक तथा क्षेत्र संचालक जयोती बॅनर्जी, पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी मार्गदर्शन केले.
बहुतांश वणवे हे मानवी हस्तक्षेपामुळे लागतात असे सांगून श्री. प्रवीण म्हणाले, वणव्यांमुळे प्राणी, कीटक जंगलाबाहेर पडून शेजारील शेतीमध्ये घुसल्याने शेतीची मोठ्या प्रमाणात नासधूस होते, पिकांवरील किडीचे प्रमाण वाढते. त्यामुळे वनक्षेत्राशेजारील नागरिकांनी वणव्यांना प्रतिबंध करण्यासाठी वनविभागाला सहकार्य करावे. वनविभागाने वणवे लावणाऱ्या गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर गुन्हे दाखल करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. वणवे प्रतिबंधासाठी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाने केलेले यशस्वी उपक्रम पुढील काळात पुणे वनविभागात राबवण्यात येतील, असेही सांगितले.
जयोती बॅनर्जी यांनी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्य वनक्षेत्रात वणवे प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांचे सादरीकरण केले. वणव्यांमुळे निसर्गसंपत्तीचा मोठा विध्वंस होतो. पिकांची धसकटे, पालापाचोळा जाळल्यामुळे पीक चांगले येते, गवत जाळल्यानंतर गवत चांगले येते हा गैरसमज असून उलट जमिनीतील उपयुक्त जीवाणू, सेंद्रीय कर्ब, ह्यूमस नष्ट होऊन जलधारणक्षमता घटते. त्यामुळे वणवे रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज असल्याचे त्या म्हणाल्या.
मेळघाट वनक्षेत्रात वणव्यांची माहिती मिळवणे, संनियंत्रण करणे तसेच वणवे प्रतिबंधासाठी पारंपरिक उपाययोजनांसह लागलेले वणवे नियंत्रणात आणण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येतो. तेथे आग प्रतिबंधक कक्ष (फायर सेल) स्थापन केला असून नासाचा उपग्रह, फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया यांच्याकडून वनव्याची माहिती (अलर्ट) येताच तात्काळ आग प्रतिबंधाचे काम सुरू होते. या पद्धतीने काम केल्यामुळे मेळघाट क्षेत्रातील वणव्यांचे प्रमाण लक्षणीयरित्या घटल्याचे श्रीमती बॅनर्जी यांनी सांगितले.
राहूल पाटील यांनी पुणे वनविभागाच्या वनक्षेत्रात वणव्यांच्या २०२० मध्ये ३९१ घटना तर २०२१ मध्ये ३९७ घटना आणि एप्रिल २०२२ पर्यंत ६५ घटना घडल्याचे सांगितले. पुणे वनविभागात सुमारे ४० टक्के वनक्षेत्र हे वनविभागाच्या हद्दीतील असून अन्य वनक्षेत्र हे जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच पीएमआरडीएच्या हद्दीतील मालकी वनक्षेत्र तसेच काही ठिकाणी खासगी वनक्षेत्र आहे. त्यामुळे वणवे प्रतिबंधासाठी या सर्व यंत्रणांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.
वणवा रोखण्यासाठी प्रयत्न करताना मृत्यूमुखी पडलेले वनशहीद सदाशिव नागठाणे यांना या परिषदेदरम्यान श्रद्धांजली वाहण्यात आली. परिषदेस पत्रकार, सरपंच, ग्राम सेवक, ग्राम व्यवस्थापन समितीचे सदस्य, वन व्यवस्थापन समिती सदस्य, अशासकीय संस्थेचे प्रतिनिधी, शहरातील टेकडी ग्रुप, पर्यावरण प्रेमी नागरिक तसेच वन विभागातील वन अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित होते. उपस्थितांच्या शंकांचे निरसन करुन त्यांनी केलेल्या उपयुक्त सूचनांचा वणवे प्रतिबंधासाठी विचार करण्यात येईल, असे उपवनसंरक्षक श्री. पाटील यांनी सांगितले.