शबनम न्युज | मुंबई
एकनाथ शिंदेंसोबत ४० शिवसेना आमदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आपल्याकडे ४० हून अधिक आमदार असल्याचा दावा शिंदे करत आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना उद्धव ठाकरेंनी हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने २०१९ मध्ये शब्द फिरविल्यामुळे एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्रीपद गेले असल्याचे संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले आहे.
शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सामना रोखठोकमधून बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली आहे. युती असती तर एकनाथ शिंदेंच मुख्यमंत्री असते असा दावा ही संजय राऊतांनी केला आहे.
“एकनाथ शिंदे व चाळीस आमदारांचे बंड म्हणजे भूकंप नव्हे. अशा अनेक भूकंपाच्या हादऱ्यातून शिवसेनेचे अस्तित्व टिकून आहे. आमदार येतात व जातात. पक्ष संघटन ठाम असते. शिंदे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे. ते नक्कीच झाले असते, पण त्यांचे मुख्यमंत्रीपद कोणी रोखले? महाराष्ट्रात राजकीय उलथापालथींना वेग आला आहे,” अशी टीका सामना रोखठोकमधून करण्यात आली आहे.