“नाविन्याचा ध्यास, कठोर परिश्रम, समर्पित वृत्ती, सुयोग्य व्यवस्थापन, काटेकोर नियोजन व अंमलबजावणी आणि कामगारांची एकजूट हेच ‘टेक्नोफोर’च्या यशाचे गमक आहे. ५० वर्षांचा हा समृद्ध वारसा नव्या पिढीने असाच पुढे न्यावा. स्थापनेपासून ते आजपर्यंतच्या प्रवासात कर्मचारी, कुटुंबीय, ग्राहक व संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या प्रत्येकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आहोत,” अशी भावना टेक्नोफोर संस्थेच्या संस्थापकांनी केली.
तंत्रज्ञानाधारित नाविन्यपूर्ण उत्पादन निर्मिती व निर्यात क्षेत्रातील अग्रणी असलेल्या टेक्नोफोर संस्थेच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त (सुवर्णमहोत्सव सोहळा) सर्वश्री रमाकांत कुलकर्णी, उदय गोडबोले व प्रवीण ढोले या तीन संस्थापकांचा कर्मचाऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला. शनिवार पेठेतील विष्णुकृपा सभागृहात आयोजित सोहळ्यात ‘टेक्नोफोर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत नानजकर, अजित गोखले, सुरेश सुब्रह्मण्यम, मनुष्यबळ विकास व्यवस्थापक मंदार पुरंदरे आदी उपस्थित होते. यावेळी चौथे संस्थापक दिवंगत श्रीकांत कुडेकर यांना आदरांजली वाहण्यात आली.
रमाकांत कुलकर्णी म्हणाले, “संस्थेतील कर्मचाऱ्यांशी आमचे नाते आपुलकीचे व जवळकीचे राहिले. ते केवळ कामगार नसून, सहकारी आहेत. त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना आवश्यक मदत करण्यावर, तसेच चांगल्या कामासाठी त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारण्यावर भर असतो. त्यातून प्रेरित होऊन कर्मचारी संस्थेच्या प्रगतीत चांगले योगदान देतात. सर्व कर्मचारी ‘टेक्नोफोर’ला कुटुंब मानून ५० वर्षांची ही परंपरा यापुढेही कायम जपतील.”
उदय गोडबोले म्हणाले, “पाचशे रुपयांच्या भांडवलात सुरु केलेला व्यवसायाला ५० वर्षे होत आहेत. आज ‘टेक्नोफोर’ जगातील ३२ देशांत उत्पादनांची निर्यात करत आहे. यामागे अपार मेहनत, नाविन्यता आणि गुणवत्ता आहे. या वाटचालीत कामगारांचे, सहकाऱ्यांचे योगदान खूप मोलाचे राहिले आहे. या प्रवासात आलेल्या अनेक अडचणींवर आत्मविश्वासाच्या जोरावर मात करून आम्ही चौघांनी ‘टेक्नोफोर’ ही संस्था नावारूपास आणली. नोकरी सोडून व्यवसायात नवनवे प्रयोग केले.”
प्रवीण ढोले म्हणाले, “आयआयटीमधील आम्ही चार वर्गमित्रांनी काहीतरी नवीन करावे, या हेतूने अल्प भांडवलात सुरु केलेला व्यवसाय जगभर विस्तारला आहे. वेळोवेळी मिळालेल्या संधीचा पुरेपूर उपयोग करून घेत ‘टेक्नोफोर’ वाढविण्याचे प्रयत्न केले. चार वेगळ्या शाखेतील अभियंत्यांनी एकत्रित येऊन केलेल्या या प्रयोगाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन ही प्रगती केली. परदेशी उत्पादने आयात करण्यापेक्षा भारतीय बनावटीची उपकरणे तयार करण्याला आमचे प्राधान्य होते.
यावेळी कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रातिनिधिक मनोगते व्यक्त करण्यात आले. मीनाक्षी दामले यांनी सूत्रसंचालन केले. अनिकेत नानजकर यांनी आभार मानले.