शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यास सुरुवात
शबनम न्युज | मुंबई
शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यास सुरुवात झाली असून, या मेळाव्यात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या मेळाव्यात भाषण करताना मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर घणाघात टीका केली आहे.
त्या म्हणाल्या, आज महाराष्ट्रामध्ये तीन मेळावे होणार. एक परंपरेने वारसा हक्काने चालत येणारा मेळावा म्हणजे पंकजाताई यांचा मेळावा झाला, दुसरे म्हणजे बाळासाहेबांनी हा संपूर्ण पक्ष स्थापना केल्यानंतर घेतलेला हा शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर घेतलेला हा शिवसेनेचा मेळावा आणि तिसरा मेळावा सर्वांना माहीतच आहे. त्या तिसऱ्या मेळाव्यामध्ये माणसं आणली जात आहेत आणि इथे माणसं स्वतः येतायेत, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी शिंदे गटावर केली आहे.
शिंदे गट नागरिकांना बसेस मध्ये आणत आहेत, पण त्या नागरिकांना हे सुद्धा माहित नाही कि आपण कोठे जात आहोत? का जात आहोत? कशासाठी जात आहोत? जर तुम्ही अशा प्रकारे गर्दी करून महाराष्ट्राची दिशाभूल करणार आहे तर महाराष्ट्राची जनता, महाराष्ट्राचे मतदार हे तुमच्या बोलतापणा बळी पडणार नाही, अशी घणाघात टीका ही पेडणेकर यांनी शिंदे गटावर केली आहे.
त्या म्हणाल्या, नेहमी वाटतं की तुम्ही गेलात तर ठीक आहे, पण स्वत:चं घर जाळण्याचं पाप करु नका. हा इतिहास तुम्ही कधी बदलू शकणार नाही आणि शिवसैनिक तुम्हाला तसं करू देणार नाही. तुमच्या माथ्यावरचा गद्दारीचा शिक्का आता कधीही पुसला जाणार नाही. कुणी सांगतं की तुम्ही भाषणं नीट करा. आम्ही नक्की नीट करू. पण तुमचे मंत्री, आमदार कुणी कुणाचे डोळे काढतंय, कोण तंगडं तोडतंय.. एक आरोग्यमंत्री म्हणतात, मी कसला भिकारी होणार? मी महाराष्ट्राला भिकारी करेन. या आरोग्यमंत्र्यांचं नामोनिशाण महाराष्ट्रातून मिटवावं लागेल. ते काम मतदारांना करावं लागेल.