शबनम न्युज | मुंबई
शिवसेनेचा दसऱ्या मेळावा सुरु झाला आहे. या मेळाव्यात नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे काय भाषण करणार? याकडे सर्वांचे लागले असताना, उद्धव ठाकरे यांनी भाषणाला सुरुवात केली आहे. भाषणात उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या अनेक वर्षांची परंपरा आणि ते दसरा मेळावे माझ्या आजही लक्षात आहेत. पण असा मेळावा फार क्वचित झाला आहे. अभूतपूर्व आहे हे. मी भारावून गेलो आहे.
ते म्हणाले, ही गर्दी विकत मिळत नाही. हे ओरबाडून घेता येत नाही. ही कोरडी गर्दी नाही. अंत:करण ओलं असलेल्या माझ्या जिवाभावाच्या शिवसैनिकांची गर्दी आहे. याच मैदानावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मी तुम्हाला नतमस्तक झालो होतो. कोणत्याही अनुभवाशिवाय तुमच्या प्रेमाच्या जोरावर कारभार केला. अजूनही डॉक्टरांनी मला वाकण्याची परवानगी दिलेली नाही. पण तुमच्यासमोर नतमस्तक झाल्याशिवाय मी पुढे जाऊच शकत नाही.
त्यांना गद्दारच म्हणणार. मंत्रीपदं तुमच्या बुडाला चिकटलेली असली, तरी ती काही काळापुरती आहेत. पण कपाळावरचा गद्दारीचा शिक्का या जन्मीतरी पुसला जाणार नाही. तेव्हा अनेकांना प्रश्न पडला की आता शिवसेनेचं काय होणार? माझ्या मनात चिंता नव्हती. आज हे शिवतीर्थ बघितल्यावर त्यांच्या मनात पुन्हा प्रश्न पडला की अरे बापरे, गद्दारांचं कसं होणार? इथे एकही माणूस भाड्याने आणलेला नाही. तासाची बोली लावून आणलेला नाही, अशी टीका ही उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर केली आहे.