शबनम न्युज | मुंबई
ठाणे आणि कळवा या तिसऱ्या खाडी पुलाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडला. या कार्यक्रमानंतर जितेंद्र आव्हाड हे मुख्यमंत्री शिंदेंच्या गाडीच्या बाजूने कार्यकर्त्यांच्या गर्दीमधून पुढे सरकत होते. त्यावेळी भाजपच्या पदाधिकारी रिदा रशीद या त्यांच्या वाटेत आल्या. तेव्हा आव्हाड यांनी रशीद यांच्या खांद्याजवळ पकडून बाजूला केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. या कार्यक्रमादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी विनयभंग केल्याचा आरोप रिदा रशीद यांनी केला आहे. आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान जितेंद्र आव्हाड आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड अतिशय भावूक झाले. ते म्हणाले, ‘माझ्यावरचा गुन्हा हा केवळ षड्यंत्राचाच भाग आहे. ‘हर हर महादेव’ चित्रपट प्रकरणात मला विनाकारण कोठडीत ठेवलं. कालचाही प्रकार अतिशय चुकीचा आहे. यापेक्षा राजकारणात न राहिलेलं बरं. मी सगळं मान्य करेन पण ३५४ (विनयभंग) आणि ३७६, यासाठी माझा जन्म झालेला नाही. एकवेळ खुनाचा गुन्हा चालला असता, पण हे मला सहन होत नाही,’ असं म्हणत आव्हाड भावूक झाले.