शबनम न्युज | मुंबई
महाराष्ट्राचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अपघातानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी रात्रीचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. विविध क्षेत्रातील तसेच सामान्य नागरिकांनीही रात्रीचा प्रवास टाळावा, असा सल्ला अजित पवारांनी दिला आहे.
बीड जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्री झालेल्या अपघातात परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने त्यांना किरकोळ दुखापत झाली होती. अपघातानंतर मुंडे यांना विमानाने मुंबईला नेण्यात आले असून, सध्या त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुंडेंची भेट घेतल्यानंतर पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि मुंडे यांच्या प्रकृतीबाबतही माहिती दिली.
यावेळी त्यांनी क्रिकेटपटू ऋषभ पंत आणि भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांची उदाहरणे देत म्हणाले कि, “पंत आणि गोरे या दोघांचाही रात्रीच्या प्रवासावेळी अपघात झाला होता.“मी राज्य विधानसभेत असेही नमूद केले आहे कि, राजकारणी आणि इतर क्षेत्रातील लोकांनी देखील रात्री 11.30 ते पहाटे 4 या वेळेत प्रवास टाळावा. कारण रस्ते आणि वाहने कितीही चांगली असली तरी झोपेच्या क्षणीही डोळे मिटले तर जीवघेणा ठरू शकतो,” असे पवार म्हणाले.
ते म्हणाले, “काल रात्री अडीच वाजता परळीत धनंजय मुंडेंचा अपघात झाला. डॉक्टरांनी सखोल तपासणी केली आहे आणि त्यांच्या 7 व्या आणि 8 व्या बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत, मुंडे यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना कधी डिस्चार्ज मिळणार याची माहिती गुरुवारी सायंकाळपर्यंत कळेल, अशी माहिती पवार यांनी दिली. त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना रुग्णालयात गर्दी न करता मुंडे लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करावे, असे आवाहन पवार यांनी केले आहे.