शबनम न्युज | पुणे
शालेय शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत विविध नावीन्यपूर्ण कल्पनांचे, विचारांचे सादरीकरण झाले आहे; त्याआधारे शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा उत्कृष्ट मसुदा तयार करावा, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिले.
लोणावळा येथील द ॲम्बी व्हॅली सिटी येथे शालेय शिक्षण विभागाच्यावतीने ‘स्टार्स’ व समग्र शिक्षा प्रकल्प, निपुण भारत, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने विचार विनिमयासाठी आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर आदी उपस्थित होते.
मंत्री केसरकर म्हणाले, या राज्यस्तरीय कार्यशाळेत सर्वच विभागांनी, महापालिका, जिल्हा परिषदांच्या शिक्षण विभागाने उत्कृष्टरित्या सादरीकरण केले आहे. नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय संस्कृती, वस्तुनिष्ठ इतिहास स्पष्टपणे दिसणे आवश्यक आहे, असेही श्री. केसरकर म्हणाले.
शिक्षणमंत्री पुढे म्हणाले, कोविड कालावधीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी सर्व घटकांनी सांघिकपणे गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र शासनाने २०२३ हे वर्ष ‘गुणवत्ता वृद्धी वर्ष: म्हणून घोषित केले आहे. केंद्र शासनाने निपुण भारत अभियान व नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रभावीपणे राबविण्याबाबत सूचित केले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे प्रशासकीय व शैक्षणिक बाबींचे नियोजन, सनियंत्रण करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
प्रधान सचिव रणजित सिंह देओल यांनीही यावेळी संवाद साधला.