शबनम न्युज | पुणे
युवा संघर्ष यात्रा नव्या पिढीची दिंडी आहे. तरूणांना नवा विश्वास, आत्मविश्वास देणारी ही यात्रा आहे. कंत्राटी भरतीचा मुद्दा युवा संघर्ष यात्रेतून उपस्थित झाला आणि सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला. सत्ता हातात ठेवायची असेल तर लोकशाहीच्या मार्गाने सुरू असेल्या या संघर्ष यात्रेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. सरकारने यात्रेकडे दुर्लक्ष केल्यास सत्ता गमवावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी येथे दिला.
युवकांच्या विविध प्रश्नासंदर्भात कर्जतचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी युवा संघर्ष यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेचा शुभारंभ मंगळवारी शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला. यानिमित्ताने टिळक स्मारक मंदिरात पवार यांची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.युवा संघर्ष यात्रेचे आयोजक, आमदार रोहित पवार, खासदार श्रीनिवास पाटील आणि वंदना चव्हाण, शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
आठशे किलोमीटर अंतराचा प्रवास संघर्ष यात्रेकडून होणार आहे. हा प्रवास सुमारे पंचेचाळीस दिवसांचा आहे. ही यात्रा तरूणांना आत्मविश्वास देणारी ठरेल. यात्रेचा प्रांरभही उत्तम झाला आहे. युवा वर्गाचा कंत्राटी भरतीचा मुद्दा यात्रेच्या सुरूवातीलाच उपस्थित करण्यात आला आणि सरकारला त्याबाबतचा निर्णय मागे घ्यावा लागला. हे या यात्रेचे यश आहे. त्यामुळे या यात्रेकडे सरकारला दुर्लक्ष करता येणार नाही.विधिमंडळ ही लोकशाहीची पंढरी आहे. या विधिमंडळाचे दर्शन व्हावे आणि शेतक-यांचे प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी जळगाव ते लातूर अशी दिंडी आम्ही काढली. ही युवा संघर्ष यात्रा आम्ही काढलेल्या दिंडीपेक्षाही मोठी आहे. त्यामुळे ती परिणामकारक ठरेल, असे पवार यांनी स्पष्ट केले.