शबनम न्युज | सावरगाव
“राजकारणात मी पडले. राजकारणात पडल्यावर कुबड्या घेऊन चालावं लागेल. या कुबड्या पक्ष देऊ शकते किंवा जनता देऊ शकते. मला जनतेने एवढ्या कुबड्या दिल्या की दोन महिन्यांत मॅरेथॉनमध्ये पळण्याची हिंमत माझ्यात आली.” असे भाषण आज सावरगाव येथील भगवान भक्तीगडावरून जाहीर सभेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले.
यावेळी त्या म्हणाल्या, “भगवान बाबांनी आपल्यावर सावली धरली आहे. आता आपल्याला ऊन लागणार नाही. आता आम्हाला त्रास देणाऱ्यांचं घर आम्ही उन्हात बांधू. आता माझी माणसं उन्हात राहणार नाहीत. आता माझी माणसं संयम दाखवणार नाहीत. आता माझी माणसं भगवान शिवाचं रूप आहेत. शिवशंकर खूप भोळा आहे. पण त्यालासुद्धा तिसरा डोळा आहे.”
दरम्यान, पंकजा मुंडे पक्षांतर करणार असल्याच्या सातत्याने चर्चा होत असतात. या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे. त्या म्हणाल्या की, पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेचीपेची नाही. पदं देऊन देऊनही तुम्हाला निष्ठा मिळवता आली नाही. पदं न देताही निष्ठा काय असते ते या लोकांना विचारा. यांच्या मनावर हजार आघात आले. दहा वेळा यांचं स्वप्न तुटलं. पण पुन्हा यांच्या डोळ्यांत स्वप्न जन्म घेत आहे. (निवडणुकीत) पडले तर पडले. कोण पडत नाही? ब्रह्मा, विष्णू महेशही आपल्या युद्धात हरले होते. श्रीदेवांनाही युद्धाचं संकट आहे. देवीलाही आसुरांविरोधात युद्ध करावं लागतं. मग युद्धाला आपण का तयार राहणार नाही? असा प्रश्नही पंकजा मुंडे यांनी विचारला.
पंकजा मुंडे यांचं हे भाषण भर उन्हात झालं. डोक्यावर सूर्य आग ओकत असतानाही हजारोंचा जनसमुदाय मुंडे भगिनींचं भाषण ऐकायला उपस्थित होता. त्यांच्यासाठी पंकजा मुंडे म्हणाल्या की, “तुम्हाला द्यायला साधी सतरंजीसुद्धा नाही माझ्याकडे. तुम्हाला मला खायला घालता येत नाहीय. तुम्ही उन्हात बसला म्हणून स्टेजवरच्यांनाही उन्हात ठेवलं आहे. कारण माझा माणूस उन्हात असेल तर सत्तेच्या खुर्चीवर बसणाऱ्याच्या डोक्यावर सावली ठेवणाऱ्याचं रक्त गोपीनाथ मुंडेंचं असूच शकत नाही. एकवेळ मला देऊ नका, पण माझ्या माणसाला दूर ठेवू शकत नाही. ज्याला ज्याला पदे दिली ते माझ्या मेळाव्यापासून दूर जाऊ शकतील. पण ही जनता कधीच माझ्या मेळाव्यापासून दूर जाणार नाही.”