शबनम न्युज | पुणे
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव आळंदी, जि. पुणे या ठिकाणी सांस्कृतिक विभागाच्या वतीने जागतिक महिला दिन व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन व कु. गायत्री पवार हिच्या स्वागत गीताने झाले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना कला शाखा विभाग प्रमुख प्रा. कैलास अस्तरकर यांनी जागतिक महिला दिन व वार्षिक पारितोषिक वितरणाचा उद्देश व महत्व अधोरेखित करून सांस्कृतिक सप्ताहामध्ये यशस्वी विद्यार्थ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांचा परिचय सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग मिसाळ यांनी करून दिला.
सांस्कृतिक विभागाच्या वतीने सांस्कृतिक महोत्सव सप्ताह अंतर्गत व्यावसायिक दिन, गीतगायन, काव्यवाचन व वक्तृत्व स्पर्धा, सामाजिक व्यक्तिमत्व व डान्स स्पर्धा व पोस्टर डे या विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विशेष प्राविण्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह व प्रमाणपत्राचे वाटप प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयातील महिला विभाग प्रमुख, सहाय्यक प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.
मा.श्री. विलास पंधारे यांनी माणसाचे भविष्य हे तळहाताच्या रेषेवर नसून आपल्या कर्मावर अवलंबून असते असे मत व्यक्त करून वाईट परिस्थिती आयुष्यात आल्यानंतर न डगमगता त्या परिस्थितीचा सामना करणे म्हणजेच खरे जीवन असून माणूस पैशापेक्षा कर्माने कसा श्रीमंत होतो या संदर्भात उदाहरणे देऊन मार्गदर्शन केले.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मा.श्री. प्रा.गुलाबराव वळसे पाटील यांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना घडविण्यामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचा कसा मोलाचा वाटा होता या संदर्भात मत मांडून स्त्रियांचे रक्षण करणे म्हणजेच राजधर्म होय तसेच प्रत्येक भारतीय नागरिकांनी महिलांचा सन्मान केला पाहिजे कारण महिला हिंदूंच्या मंदिरातील देवता असून भक्ती आणि शक्ती यांचा संगम आहे. प्रत्येक तरुण वर्गाने स्त्रियांच्या सन्मानाच्या बाबतीत आत्मा परीक्षण केले पाहिजे आपल्यामधील अहंभाव काढून टाकून सामर्थ्य, कर्तत्व, संयम या मूल्यांचा स्वीकार केला पाहिजे. कर्तत्वाच्या संदर्भात कर्मवीर भाऊराव पाटील, अण्णा हजारे यांचा संदर्भ देऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी कसे शून्यातून ब्रह्मांड निर्माण केले शिवाजी महाराजांसाठी आणि रयतेच्या राज्यासाठी मावळे स्वतःचा जीव देण्यास व शत्रूचा जीव घेण्यास स्वतःहून तयार होते याचे कारण म्हणजे कर्तत्व होय. तरुणांनी चिंतन, वाचनव व्यासंग जागृत ठेवला पाहिजे कारण आयुष्यात संधीची लाट एकदाच येते त्याचा आपण तटपटीने फायदा घेतला पाहिजे असे मत व्यक्त करून जीवन जगताना स्वतःवर प्रेम करण्यापेक्षा दुसऱ्यावर प्रेम करायला शिकले पाहिजे असे मत मांडून बहुमोल मार्गदर्शन केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हंसराज थोरात यांनी जागतिक महिला दिन हा स्त्रीशक्तीला वंदन करून त्यांची थोरवी सांगण्याचा दिवस असून तसेच बुद्धिमत्ता, प्रेम, ममता, आपुलकी, सुसंस्कार, कर्तव्यदक्षता हे गुण स्त्रीमध्ये कसे उपजत असतात या संदर्भात विविध उदाहरणांचे दाखले देत संस्थेचे ब्रीद वाक्य ‘ महिलांसाठी शिक्षण सर्वांसाठी शिक्षण’ महिला दिनानिमित्त कसे विशेष आहे या संदर्भात विवेचन करून छत्रपती शिवाजी महाराज,महर्षी धोंडो केशव कर्वे, महादेव गोविंद रानडे व महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्रियांचा जसा सन्मान केला तशाच सन्मानाची आज गरज असून आधुनिक काळात स्त्रीने कला,उद्योग,शिक्षण,राजकारण व समाजकारण या क्षेत्रात कशी उत्तुंग भरारी घेतली आहे या संदर्भात विविध उदाहरणांचे दाखले देत मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार मा. श्री. मयूर मुरलीधर ढमाले यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमासाठी प्रा. संजीव कांबळे, डॉ.सुरेंद्र पवार प्रा.शाहूराज येवते, प्रा. रोहित कांबळे, प्रा.महेश म्हसागर,श्री.प्रवीण भावे, प्रा.रेखा सुतार,डॉ.छाया जोशी,प्रा.सविता मानके प्रा.यशोदा आनेराव, प्रा.प्रेरणा पाटील, प्रा.सोनाली अभंग, प्रा.माधुरी चौधरी,प्रा.पूजा खवले, प्रा.पूजा मिटकरी, प्रा.सुरेखा व्यवहारे, प्रा. प्रियंका वहिले,प्रा.कीर्ती राऊत, सौ. वर्षा ताजणे, श्री. वैभव बडवे,श्री.श्रीकांत कांबळे सौ. वैशाली ढाकणे, सौ शारदा बुरकुल इत्यादी विभागप्रमुख,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा दिलीप बारी व सोनाली अभंग यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. परमेश्वर भत्ताशे यांनी मानले. या कार्यक्रमाचे सांगता सामूहिक पसायदानाने झाले अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा.माणिक कसाब यांनी दिली.