शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले असल्याने लॉक डाउन चे निर्बंध शिथिल करून व्यापारी व कामगार वर्गाला दिलासा द्यावा अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा भाजपाचे मुख्य प्रवक्ते अमोल थोरात यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
या संदर्भात अमोल थोरात यांनी पालकमंत्री अजित पवार यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, राज्यात कोरोना रुग्ण कमी झाल्याने 22 जिल्ह्यांमधील लॉक डाऊन निर्बंध उठविण्यात आले आहेत मात्र पुणे जिल्ह्यासह 11 जिल्ह्यांमध्ये निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत त्यामुळे या भागातील व्यापारी व कामगार वर्ग अडचणीत आला आहे.
कोरोना काळात लादण्यात आलेल्या निर्बंधानुसार व्यापाऱ्यांना सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे वास्तविक पिंपरी-चिंचवड ही उद्योग नगरी आहे या नगरीत कामगार वर्गाचे प्रमाण मोठे आहे. अनेकांच्या कामाच्या वेळा सकाळी 7 अथवा 8 ते सायंकाळी चार व पाच वाजेपर्यंत आहेत. त्यामुळे बहुतेक कामगार खरेदीसाठी संध्याकाळीच बाहेर पडतात .मात्र दुकाने चार वाजताच बंद होत असल्याने व्यापारी वर्ग व कामगार दोघांचीही अडचण होत आहे.
पिंपरी-चिंचवड मध्ये कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे बुधवारी पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचे 172 रुग्ण आढळून आले तर महापालिका हद्दीतील एकाचा व महापालिका हद्दीबाहेरील तिघांचा मृत्यू झाला पिंपरी-चिंचवडचा पॉझिटिव्हिटी दर पाच टक्क्यांच्या आत आहे कोरोना परिस्थिती हळूहळू पण निश्चित सुधारत असल्याने निर्बंधामध्ये शिथिलता देणे गरजेचे आहे .त्यामुळे शहरातील दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी द्यावी अशी मागणी थोरात यांनी केली आहे.