आत्मनिर्भर भारत योजने’तून पिंपरी-चिंचवडमधील उद्योगाला उभारी मिळणार
केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी दिले आश्वासन
भाजयुमो प्रदेशउपाध्यक्ष अनुप मोरे यांनी मांडली उद्योजकांची व्यथा
पिंपरी (प्रतिनिधी) –
कोरोनाकाळात राज्यातील महाविकास आघाडी सरकारने लावलेल्या निर्बंधामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील छोटे-मोठे उद्योग अडचणीत आले. लॉकडाऊन काळात उद्योगांची विस्कटलेली आर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी भाजपाचे प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील आणि उपाध्यक्ष अनुप मोरे यांनी दिल्ली येथे केंद्रातील सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. पिंपरी-चिंचवडमधील उद्योगवाढीशी संबंधित मुद्यांवर त्यांच्यात चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपाचे नेते नारायण राणे यांच्यावर केंद्रातील महत्वाची जबाबदारी सोपविली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून राज्यातील उद्योगाला चालणा देण्यासाठी राणे यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्याचा फायदा देशातील करोडो कामगारांना होणार आहे. कारण, कोरोना प्रादुर्भावाचा मुद्दा उपस्थित करून राज्य सरकारने मार्च 2020 पासून लॉकडाऊन लागू केले. उद्योग, व्यवसायांवर सुध्दा कडक निर्बंध लादले. यामुळे उद्योगाची आर्थिक घडी विस्कटल्याने लाखो कामगारांच्या नोक-या गेल्या. काहींना 50 टक्के मासिक वेतनावर काम करण्याची वेळ आली. तर, उलाढाल नसल्यामुळे काहींचे वेतन गेल्या दीड वर्षापासून थकीत आहे. असंख्य कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा बिकट परिस्थितीतून उद्योजक आणि व्यवसायिकांची वाटचाल सुरू आहे. यातून मार्ग काढण्यासाठी अनुप मोरे यांनी केंद्रीय मंत्री राणे यांच्यासोबत चर्चा केली.
पिंपरी-चिंचवड शहर हे उद्योगनगरी म्हणून ओळखले जाते. परंतु, राज्यातील बेजबाबदार सरकारच्या कुटील कारस्तानामुळे उद्योगनगरीतील उद्योगांवर वाईट वेळ आली आहे. लॉकडाऊन काळात लादलेल्या निर्बंधामुळे उद्योजक मेटाकुटीला आले आहेत. उलाढाल होत नसल्यामुळे छोट्या-मोठ्या उद्योजकांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. यातू मार्ग काढण्यासाठी “आत्मनिर्भर भारत रोजगार योजना’’ याच्या माध्यमातून उद्योग आणि कामगाराची आर्थिक घडी बसवण्यासाठी हातभार लावावा. उद्योग वाढीसाठी केंद्रीय उद्योग मंत्रालयाच्या विशेष पॅकेजमध्ये पिंपरी-चिंचवडचा समावेश करावा. जेणेकरून उद्योगाची उलाढाल वाढून लाखो कामगारांचा आर्थिक लाभ होईल. याबाबत शहरातील कामगारांना आपल्याकडून आपेक्षा लागली आहे, अशी भावना अनुप मोरे यांनी मंत्री राणे यांच्यासमोर व्यक्त केली.
रोजगार टिकवण्यासाठी मदत करणार – नारायण राणे
शहरात व्यवसायिकांनी राज्य सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला होता. तरीही सरकारने व्यवसायिकांना निर्बंधातून सूट दिली नाही. उद्योगाला कोरोना निर्बंधातून सूट देण्याची मागणी करून देखील सरकारमधील निष्ठूर नेत्यांनी त्यावर भूमिका घेतली नाही. उद्योग, व्यवसाय टिकला तरच कामगार टिकणार आहे, हे अनेकदा सरकारला बजावून सांगितले. परंतु, सरकारने ही बाब मनावर घेतलीच नाही. हे सरकार सर्वसामान्यांच्या विरोधातील सरकार असून आता नागरिकांचा संयम सुटत चालला आहे. आपण पुढाकार घेऊन छोटे-मोठे व्यवसाय, उद्योग पुन्हा सुरू करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव वाढवून सामान्य नागरिकांना त्याच्या रोजीरोटीची व्यवस्था करावी. या आणि अशा असंख्य मुद्यांवर विक्रांत पाटील, अनुप मोरे, सरचिटणीस राहूल लोणीकर आणि मंत्री राणे यांच्यात चर्चा झाली. त्यावर मंत्री राणे यांनी सकारात्मक उत्तर दिले. लवकरच आपण आत्मनिर्भर भारत रोजगार योजनेसह उद्योगाशी संबंधित अन्य योजनांच्या माध्यमातून उद्योग व रोजगार वाढवण्यासाठी निर्णय घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले