शबनम न्युज | मुंबई
जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजप निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. देशभर यात्रेच्या नावाखाली गर्दी जमवली जात आहे. दुसऱ्या लाटेच्यावेळी देखील निवडणुकीसाठी अफाट गर्दी जमवल्याने हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला, याला भाजप कारणीभूत होती ही सत्य परिस्थिती आहे. निवडणुका येत-जात राहतील परंतु लोकांचे जीव महत्त्वाचे आहेत हे भाजपच्या लोकांना कळले पाहिजे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
आयसीएमआर आणि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन व या क्षेत्रातील विविध तज्ज्ञांनी गर्दी टाळली नाही तर तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली आहे. मात्र जनआशीर्वाद यात्रेच्या निमित्ताने भाजप गर्दी जमवत आहे. राज्यात राजकीय कार्यक्रम होत आहेत. या राजकीय कार्यक्रमांमुळे तिसऱ्या लाटेचा धोका निर्माण झाला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमांचे उल्लंघन होत असेल तर निश्चितरुपाने गुन्हा दाखल करुन कारवाई होईल, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.