शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
राज्याची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातून महामानव ज्योतिबा आणि सावित्री आई फुले यांनी सामाजिक,शैक्षणिक क्रांतीची मशाल पेटवली होती. राज्याला लाभलेला फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांचा वारसा तसेच संत परंपरेमुळे महाराष्ट्राला पुरोगामी अशी ओळख मिळाली आहे.अशात पुण्यातील पीडित, शोषित,उपेक्षितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी यंदा पुणे महानगर पालिकेवर बहुजन समाज पार्टीचा निळा झेंडा फडकेल.बसपाचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी आणि हितचिंतक या अनुषंगाने प्रयत्नरत आहेत, असे प्रतिपादन बसपाचे प्रदेशाध्यक्ष अँड.संदीप ताजने यांनी शुक्रवारी केले. पुणे येथील पुणे इंटरनॅशनल स्कूल, टिंगरे नगर परिसरात आयोजित संवाद यात्रेतून त्यांनी बसपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना महाविकास आघाडी सरकार तसेच भाजपच्या कार्यपद्धतीवर ही ताशेरे ओढले.
आगामी महानगरपालिका निवडणूक बसपा स्वबळावर लढवणार आहे.शहरातील झोपडपट्टी धारकांच्या विकासाकरीत त्यांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी बसपा कटिबद्ध आहे.झोपडपट्ट्यांच्या जमिनीवर शहरातील बड्या बिल्डर लॉबीची नजर आहे आहे. अशात झोपडपट्टीधारकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी बसपाच एकमेव पर्याय आहे.मतदारांनी बसपाच्या बाजूने कौल दिला, तर सर्वसमावेश विकास बसपा करेल.आरोग्याचा प्रश्न असो, रस्त्यांचा अथवा स्थानिक विकासाचा, बसपा सर्वच आघाड्यांवर शहराचा विकास करण्यासाठी सज्ज आहे.’सर्वजन हिताय,सर्वजन सुखाय’ करिता एससी,एसटी,ओबीसी तसेच सर्वजनांना बसपाच्या झेंडाखाली एकत्रित यावे लागेल,असे आवाहन देखील त्यांनी यानिमित्ताने केले.
भाजप, कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस पीडित, शोषितांना न्याय देवू शकत नाही.केवळ बसपाच सर्वसमावेशक विकासासाठी पर्याय आहे.आगामी निवडणुकांमध्ये पार्टीची ताकद दिसून येईल. पार्टी स्वबळावर निवडणूक लढवून सर्वसमावेशक विकास करीत सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नरत आहे.संवाद यात्रेमुळे बसपाच्या बाजूने बरेच सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.पार्टीचा कार्यकर्ता,पदाधिकारी शेवटच्या नागरिकापर्यंत मान्यवर कांशीराम जी यांचे विचार पोहचवण्याचे काम करीत असल्याचे अँड.ताजने म्हणाले.
कार्यक्रमात प्रदेश महासचिव सुदीप गायकवाड, प्रदेश सचिव भाऊ शिंदे, प्रदेश सदस्य राहुल ओव्हाळख, जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड, मेहमूद जकाते, गणेश खंदारे, रमेश गायकवाड, प्रवीण वाकोडे, पिपरी—चिंचवडचे अध्यक्ष सुरज गायकवाड, ओबीसी नेते बापू कुदळे, सुरेश दादा गायकवाड, जिल्हा अध्यक्ष हूलगेश चलवादी, सोनू निकाळजे तसेच जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
सत्ताधाऱ्यांच्या पापांमुळेच राज्यातील अँट्रॉसिटी अत्याचारांमध्ये वाढ-रैना
देशाला सामाजिक क्रांतीची दिशा देणाऱ्या पुरोगामी, पुढारलेल्या महाराष्ट्रात पीडित, शोषित, उपेक्षितांची आजही अवहेलना होते.भाजप,महाविकास आघाडी सरकार याला सर्वस्वी जबाबदार आहे. केवळ राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी या राजकीय पक्षांकडून उपेक्षितांचा वापर केला जातो,असा आरोप बसपाचे राज्य प्रभारी प्रमोद रैना यांनी केला. राज्यात २०१७ पासुन अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती वरील अत्याचारात वाढ झाली आहे. अँट्रॉसिटीच्या प्रमाणात ५० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.अँट्रॉसिटीच्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र देशात पाचव्या क्रमांकावर आहे.ही बाब पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी आहे, अशी संतप्त भावना देखील त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात मोठी सामाजिक क्रांती घडून आली आहे. असे असतानांही राज्यात मोठ्या प्रमाणात एससी,एसटी यांच्यावरील अत्याचारात वाढ होण्यास राज्यकर्त्यांचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याचे रैना म्हणाले.