शबनम न्यूज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2021 अंतर्गत विमा कंपन्यांना देय असलेले पहिल्या हप्त्यापोटी रुपये 973 कोटी 16 लक्ष अनुदान राज्य शासनाने वितरीत केले असून ते त्वरित विमा कंपन्यांना देण्यात येणार असल्याने त्यानंतर विमा कंपनीमार्फत मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती जाहीर झालेल्या महसूल मंडळातील अधिसूचित पिकांसाठी भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना 25 टक्के नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2021 मध्ये राज्यातील 83 लाख 87 हजार शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला आहे. चालू वर्षीच्या खरीप हंगामामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसातील खंड पडल्यामुळे पिकांच्या सरासरी उत्पादकतेत 50 टक्क्याहून अधिक घट येण्याची शक्यता निर्माण झाल्याने राज्यातील 22 जिल्ह्यात हंगाम प्रतिकूल परिस्थिती अंतर्गत सुमारे 39 लाख 94 हजार शेतकऱ्यांच्या साधारणत: 27 लाख हेक्टर क्षेत्रासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना निर्गमित केल्या आहेत.
अधिसूचना निर्गमित झालेल्या महसूल मंडळातील अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत भाग घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेचे 25 टक्के रक्कम विमा कंपनीकडून तात्काळ देण्याची तरतूद योजनेत आहे. मात्र त्यासाठी राज्य शासनाकडून विमा अनुदानाचा पहिला हप्ता विमा कंपन्यांना देणे आवश्यक असते. हा हप्ता राज्य शासनाने वितरीत केल्याने मिळणारी नुकसान भरपाई रक्कम नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांचे बियाणे खरेदी करणे, खत आणि औषधांची खरेदी करणे यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास कृषि आयुक्त धीरज कुमार यांनी व्यक्त केला आहे.