शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
भारतीय तरुणांमध्ये खूप क्षमता आहे. या क्षमतेचे कौशल्यात रुपांतर होण्यासाठी योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाची, अनुभवाची गरज आहे. देशात हजारो महाविद्यालये आहेत. यातून दरवर्षी लाखो विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात. परंतू कौशल्याअभावी त्यांची गणना बेरोजगारात होते. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून बारावी उत्तीर्ण किंवा आयटीआय झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या कौशल्य प्रशिक्षण वर्गांमुळे आता बेरोजगारीवर नियंत्रण मिळवता येईल असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
आकुर्डी येथील पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टमध्ये शनिवारी (दि. 23 ऑक्टोबर) ‘आयटीआय विद्यार्थ्यांसाठी करिअरच्या संधी’ या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई, आकुर्डी डी. वाय. पाटील ॲकेडमिक एज्युकेशन एक्सलन्स फेडरेशनचे कार्यकारी संचालक हुसेन हाजिते, करिअर मार्गदर्शक विवेक वेलणकर, यशस्वी ॲकेडमिचे संजय छत्रे, एनएमआयईटीचे प्राचार्य डॉ. ललितकुमार वाधवा, पीसीएमसी मोरवाडी आयटीआयचे प्राचार्य शशिकांत पाटील, गट निर्देशक प्राचार्य प्रकाश घोडके आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना, मार्गदर्शन करताना आयुक्त राजेश पाटील म्हणाले, विकसीत राष्ट्रांमध्ये बहुविध कौशल्य असणा-या व्यक्तिंना सन्मानपुर्वक वागणूक मिळते. अशा व्यक्तींसाठी ‘जागतिक कौशल्य स्पर्धा’ म्हणजे ऑलिपिंक आहे. पीसीईटी संस्थेनेही आता या स्पर्धेसाठी बहुविध कौशल्य असणारे विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत. जग वेगाने बदलत आहे. बदलत्या तंत्रज्ञानामुळे दहा वर्षांपुर्वीच्या नोकरीच्या संधी आता नाहीत. आजचे शिक्षण पुढील दहा वर्षात कालबाह्य होत आहे. त्यासाठी नवनविन तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. अन्यथा ती व्यक्ती प्रवाहातून बाहेर पडेल. व्यवसायिक कौशल्य असणा-यांना जगभर संधी आहेत त्याचा लाभ घेतला पाहिजे असेही आयुक्त राजेश पाटील म्हणाले.
स्वागत डॉ. गिरीष देसाई, प्रास्ताविक प्रा. केतन देसले, सुत्रसंचालन आणि आभार प्रा. अश्विनी वझे यांनी मानले.