माजी नगरसेवक शैलेश मोरे यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंकडे मागणी
प्रतिनिधी, 23 एप्रिल 2022 – चिंचवड रेल्वे महामार्गालगतच्या जागेतील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांची घरे रेल्वे विभागाकडून हटवण्यात येणार आहेत. त्यामुळे हजारो नागरिक बेघर होणार आहेत, असे सांगत संबंधित नागरिकांचे तत्काळ पुनर्वसन करावे, अशी मागणी माजी नगरसेवक शैलेश मोरे यांनी केली आहे.
यासंदर्भात शैलेश मोरे यांनी थेट केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली व मागणीचे निवेदन दिले. याप्रसंगी मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे हे उपस्थित होते.
यासंदर्भात बोलताना शैलेश मोरे म्हणले की, चिंचवडमधील रेल्वेलगतच्या आनंद नगर, साई बाबा नगर, दळवी नगर मधील झोपडपट्टीधारकांना १५ दिवसांत घरे रिकामी करण्याबाबत रेल्वेने नोटीस बजावली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. झोपडपट्टीधारकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. चिंचवड स्टेशन भागात रेल्वेच्या जमिनीवर नागरिकांच्या 50 वर्षांपासून झोपड्या आहेत. रेल्वेकडून कारवाई झाल्यास हजारो नागरिक बेघर होणार आहेत.
त्यामुळे या नागरिकांच्या घरांवर कारवाई करण्यापूर्वी आधी त्यांचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी माजी नगरसेवक मोरे यांनी रावसाहेब दानवे यांच्याकडे केली.