शबनम न्युज | औंध
‘‘महाविद्यालयीन युवकांना योग्यवेळी जे पाहिजे ते देण्याचे कर्तव्य अध्यापक, महाविद्यालय तसेच शिक्षण संस्था पार पाडत असतात. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना असे भरभरून देण्याचे काम आत्तापर्यंत रयत शिक्षण संस्था करीत आली आहे, म्हणून रयतचा विद्यार्थी नव्या युगाचा नवा माणूस म्हणून बाहेर पडताना दिसतो, ज्यांच्यामध्ये सामाजिक समतेची बांधिलकी आणि नवकौशल्य विकसित करून उपयोगात आणण्याचा ध्यास आहे,’’ असे प्रतिपादन चिखलीच्या कॉक्वेस्ट महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ. प्रदीप कदम यांनी केले.
येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभा प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागीय कार्यालयाचे अधिकारी श्री. किसनराव रत्नपारखी होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे, कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संजय नगरकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. अशोकराव मुरकुटे, हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंडित शेळके, उपप्राचार्य डॉ. रमेश रणदिवे ,पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष डॉ. बंडोपंत कांबळे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष सूर्यकांत सरवदे, अरविंद जाधव, विद्यार्थी प्रतिनिधी ओमकार भोईर आदी यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा.कदम यांनी ‘‘युवकांनी कलाकौशल्याबरोबरच आरोग्य ,क्रीडा, सामाजिक संवाद विकसित करून आपले कार्यक्षेत्र निश्चित करावे व स्वीकारलेली जबाबदारी पार पाडावी,’’ असा महत्त्वपूर्ण संदेश देखील दिला.
डॉ.संजय नगरकर यांनी आपल्या मनोगतात, ‘‘महाविद्यालयीन युवकांमध्ये नवनिर्मितीची अफाट स्वप्न असतात, अशा स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अध्यापक नेमकी आणि विशालदृष्टी देतात, म्हणूनच विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये ऋणानुबंधाचे नाते निर्माण होत असते,’’ असे मत व्यक्त केले आणि विद्यार्थ्यांना भावी जीवनासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.
अध्यक्षीय मनोगतात श्री. रत्नपारखी यांनी कर्मवीरांच्या शैक्षणिक, सामाजिक तत्वज्ञानाचा आढावा घेत कर्मवीर अण्णा वटवृक्षाप्रमाणे निःस्वार्थी होते, म्हणूनच आज बांधिलकीच्या भूमिकेतून रयतचे अध्यापक आणि विद्यार्थी समाजात वावरताना दिसतात, याचा अभिमान वाटतो असे प्रतिपादन केले. सांस्कृतिक विभाग, क्रीडा, वाणिज्य विभाग, शॉर्ट टर्म कोर्स या विभागांनी घेतलेल्या विविध स्पर्धांत चमकलेल्या तसेच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करून गौरव करण्यात आला.
रयत गीत व दीपप्रज्वलन करून प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचा परिचय प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी करून दिला. वर्षभराचा महाविद्यालयाचा लेखाजोखा म्हणजे वार्षिक अहवाल वाचन सोहळ्याचे कार्याध्यक्ष डॉ. बंडोपंत कांबळे यांनी केले. सोमवार, दि.२५ एप्रिल ते गुरुवार, दि.२८ एप्रिल २०२२ या कालावधीत ‘शॉर्ट टर्म कोर्स, उद्योजकता विकास कार्यशाळा, सांस्कृतिक कला स्पर्धा, पारितोषिक वितरण सोहळा’ अशा भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांस महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा भरभरून प्रतिसाद होता. कोरोना नंतर हे सर्व कार्यक्रम होत असल्याने तरुणाईच्या उत्साहाला बहर आला होता. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रा. कु.सायली गोसावी यांनी सूत्रसंचालन केले तर शेवटी विद्यार्थी प्रतिनिधी ऋषिकेश कानवटे याने यथोचित सर्वांचे आभार व्यक्त केले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.मयूर माळी, प्रा.कुशल पाखले, प्रा.चंद्रकांत बोरुडे, प्रा.मारुती कांबळे, अधीक्षक श्री.सखाराम शिंगाडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
कर्मवीर करंडकाचेही वितरण
या कार्यक्रमात विद्यार्थी संघटना व मराठी विभागाच्यावतीने आयोजित ‘आंतरमहाविद्यालयीन कर्मवीर करंडक पथनाट्य स्पर्धे’चेही पारितोषिक वितरणही यावेळी पार पडले. या स्पर्धेचा विशेष फिरता कर्मवीर करंडक या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण होते. हडपसर येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा संघ या करंडकाचा मानकरी ठरला. या स्पर्धेमध्ये एकूण ४२ संघांनी सहभाग घेतला होता. सांस्कृतिक विभाग पारितोषिक वितरण अहवाल वाचन प्रा.डॉ. रेश्मा दिवेकर, वाणिज्य व गुणवत्ता पारितोषिक वितरण अहवाल वाचन प्रा.आसावरी शेवाळे, क्रीडा विभागाच्या पारितोषिक वितरणाचा अहवाल जिमखाना विभागप्रमुख प्रा.भीमराव पाटील तर पथनाट्य स्पर्धा पारितोषिक वितरण अहवाल वाचन इंग्रजी विभागप्रमुख, प्रा.डॉ. सविता पाटील यांनी केले.