शबनम न्युज | मुंबई
संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेनं वाट पाहात आहे, त्या मान्सूनचं महाराष्ट्रात नेमकं कधी आगमन होणार आहे, याविषयी देखील भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. नैऋत्य मोसमी पावसाचं अर्थात मान्सूनचं अंदमानमध्ये अर्थात बंगालच्या उपसागरात १६ मे रोजीच आगमन झालं आहे. याशिवाय केरळमध्ये येत्या २७ मे रोजीच पावसाचं झोकात आगमन होणार असल्याचं देखील हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. राज्यातील खरीप हंगामापूर्वी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे.
होसाळीकर यांनी बैठकीत दिलेल्या माहितीनुसार, येत्या ५ जून रोजी महाराष्ट्रात तळ कोकणात मान्सून दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. अंदमानमध्ये १६ मे रोजी दाखल झालेल्या मान्सूनचं केरळमध्ये २७ मे रोजी आगमन होण्याचा देखील अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.