शबनम न्युज | पुणे
‘पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत ‘जीविधा’संस्थेच्या ‘हिरवाई तपपूर्ती महोत्सव’ त शुक्रवार, 10 जून रोजी डॉ श्रीनाथ कवडे यांनी ‘वनस्पती व प्राण्यांमधील परस्पर संबंध’ या विषयावर व्याख्यान दिले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
९ ते ११ जून दरम्यान इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र, राजेंद्रनगर येथे हा महोत्सव आयोजित करण्यात आला असून वनस्पती,प्राणी,हिरवाई आणि पर्यावरण रक्षणाची चर्चा करणारी व्याख्याने,बिया वाटप आणि देशी वनस्पतींच्या लागवडीसाठी जनजागृती असे या महोत्सवाचे स्वरूप आहे.
डॉ. कवडे म्हणाले, ‘ पश्चिम घाट हा प्रचंड जैववैविध्य असणारा भाग आहे. दुर्मीळ आणि अस्तंगत होत जाणाऱ्या अनेक वनस्पती पश्चिम घाटात आहेत.पश्चिम घाटातील जैववैविध्य हा वारसा आहे, जगात तो कोठेही पाहायला मिळणार नाही. हा वारसा जपला पाहिजे.
वनस्पती -प्राणी संबंध पूर्वापार आहेत. हजारो वर्षातून ते तयार झाले आहेत. वनस्पती- प्राणी एकमेकांवर अवलंबून असतात. त्यानुसारच परिसंस्था तयार झाली आहे. हे संबंध अबाधित राहिले पाहिजे.बऱ्याच वनस्पतीच्या परागीभवनासाठी , बिया वाहून नेण्यासाठी कीटक, प्राणी यांची मदत होते. १२६ प्रकारच्या वनस्पतींवर वानरे जातात. काटेसावरीला फुले आली की २८ प्रकारचे पक्षी त्या वृक्षावर येऊन जातात. लाल रंगाच्या फुलांवर पक्षी आकृष्ट होतो. महाधनेश ( ग्रेट पाईड हॉर्नबील ) असलेले जंगल समृद्ध असते, अनेकदा आंब्यामध्ये आत जाऊन कीटक माशी अंडी घालण्याचे ठिकाण बनवतात,अशी हजारो उदाहरणे आहेत.
‘जीविधा’संस्थेचे संस्थापक राजीव पंडित यांनी प्रास्ताविक केले. ९ ते ११ जून पासून सायंकाळी 6.30 ते 8.00 दरम्यान व्याख्याने होत आहेत. शनिवार, 11 जून रोजी डॉ विनया घाटे या ‘ पुण्याची बदलती हिरवाई ‘ या विषयी बोलणार आहेत. याच दिवशी रमा कुकनुर व सहकारी भरतनाट्यम नृत्यातून वनस्पती विश्व साकार करणार आहेत.
या महोत्सवात दिनांक 9 ते 11 जून दरम्यान सायंकाळी 4 ते रात्री 8 दरम्यान
निसर्गसेवक ‘संस्थेचे ‘रानभाज्या’ विषयक भित्तीपत्रकाचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. महोत्सवातील सगळे कार्यक्रम सर्वासाठी मोफत खुले आहेत.
देशी वनस्पतींच्या लागवडीसाठी जनजागृत
पर्यावरणप्रेमी नागरिकांना रोप पुरवण्याचे महत्त्वाचे काम करणाऱ्या देवराई फाऊंडेशनचे रघुनाथ ढोले यांना हातभार लावण्यासाठी ‘घरोघरी रोपवाटिका’ हा उपक्रमही महोत्सवात आयोजित करण्यात आला आहे. आपापल्या घरी प्रत्येकाने फक्त 5 रोपे वर्षभर वाढवून वनिकरण करणाऱ्यांना उपलब्ध करून दिली तर वनस्पती विविधता वाढायला मदत होईल,असा विचार या उपक्रमामागे आहे. यासाठी जीविधा तर्फे आवाहन करण्यात येत आहे की नागरिकांनी 5 बिया घेऊन जाव्यात. त्यांची रोप वाढवून पुढील पावसाळ्याच्या सुरवातीला परत आणून द्यावीत. त्यांची योग्य ठिकाणी लागवड होईल हे बघण्याची जबाबदारी जीविधा संस्था घेईल. या मोहिमेला सुरुवात हिरवाई महोत्सवातून होणार आहे. कार्यक्रमाच्या वेळात इंद्रधनुष्य पर्यावरण केंद्र येथे आपली सर्व माहिती देऊन बिया घेऊन जाव्यात. नितीन कुलकर्णी या मोहिमेचे प्रमुख आहेत . अधिक माहितीसाठी नितीन कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधता येईल 9673009964 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.