लोकमान्य टिळकांना युवक काँग्रेसचे अभिवादन
शबनम न्युज | पिंपरी
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे चरित्र हे वाचून जाणवून घेण्यापेक्षा अनुकरणीय आहे. त्यांच्या ज्वलंत राष्ट्रवादाचे युवकांनी अनुकरण करणे हीच त्यांच्या जयंती निमित्ताने आदरांजली ठरेल असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसचे अध्यक्ष कौस्तुभ नवले यांनी केले.
लोकमान्य टिळक यांच्या जयंतनिमित्त युवक काँग्रेसचे अध्यक्ष नवले यांच्या हस्ते टिळकांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
शनिवारी ( दि. २३ जुलै) काळेवाडी पिंपरी येथील युवक काँग्रेसच्या कार्यालयात युवक काँग्रेसने आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपाध्यक्ष चंद्रशेखर जाधव, सरचिटणीस विशाल कसबे, गौरव चौधरी, वासिम शेख, पिंपरी विधानसभा अध्यक्ष प्रतिक जगताप, भोसरी विधानसभा अध्यक्ष जमीर शेख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी कौस्तुभ नवले म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी स्वराज्याचा उल्लेख करताना ‘स्व’ म्हणजे ‘प्रजा’ म्हणजेच प्रजेचे राज्य ही लोकशाहीची बीजे सांगितली. लोकमान्य टिळकांच्या स्वराज्याच्या उच्चारात स्वातंत्र्य हा जन्मसिद्ध हक्क जसा सामील होता तसाच स्वधर्म, स्वराष्ट्र, स्वाभिमान, स्वदेशीही सामील होता. लोकमान्य टिळकांनी पुरस्कारलेल्या स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षणात आधुनिक भारताच्या पायारचनेचे बीज विचार आहेत. असेही नवले म्हणाले.
युवक काँग्रेसचे शहर उप अध्यक्ष चंद्रशेखर जाधव यांनी सांगितले की, लोकमान्य टिळक यांच्या विचारांत राष्ट्रीय, आर्थिक धोरण, स्वदेशी उद्योगधंदे, व्यापार्यांची प्रगती, उपयुक्त शिक्षण, सहकार, रोजगार, संशोधन, शेती, उत्पादनाची वृद्धी इत्यादी प्रगतशील भारताचे बीज विचार आहेत. बहिष्कार हे अहिंसक शस्त्र टिळकांनी सर्वसामान्य जनतेस दिले आणि पारतंत्र्यात स्वदेशी मालास बाजारपेठ निर्माण करून देशी उद्योगांना ऊजिर्त केले. स्वदेशी बँक, बॉम्बे स्वदेशी स्टोअर, पैसा फंड, साधना विद्यालय या पूरक चळवळी उभ्या केल्या. व्यक्ती, समाज आणि देश या चढत्या क्रमाने कर्माचा मार्ग दाखविला. लोकांना नीतिशास्त्र समजावले. लोकमान्य टिळकांच्या चरित्र, चारित्र्य आणि विचारांचा मागोवा घेताना त्यात आधुनिक भारताच्या नव निर्मितीची बीजे आढळतात. आजही भारतापुढे जेव्हा राष्ट्रीयत्व, स्वातंत्रता, प्रजासत्ताक राज्यपद्धती, लोकशाही, बेरोजगारी, शेती समानता असे प्रश्न उद्भवतात, तेव्हा लोकमान्य टिळकांच्या बीज विचारांचा संदर्भ घ्यावा लागतो. स्वागत गौरव चौधरी, सूत्रसंचालन प्रतीक जाधव, आभार चंद्रशेखर जाधव यांनी मानले.