शबनम न्युज | पुणे
‘डॉ. कुमार सप्तर्षी हे प्रेम,बंधुता आणि एकात्मतेसाठी झटणारे व्यक्तिमत्व आहे. साधी राहणी , उच्च विचारसरणी असणारे आजच्या काळातील ते महात्मा गांधी आहेत. तरुणांना मार्गदर्शन करणारे विद्यापीठ आहेत. डॉ. उर्मिला सप्तर्षी यांनी त्यांना उत्तम साथ दिली या दांपत्याला दीर्घायुष्य लाभो. आज त्यांच्यावर प्रकाशित झालेला ग्रंथ जीवन कार्यावर प्रकाश टाकणारा असून पुढच्या पिढीला तो मार्गदर्शक ठरेल ‘ , असे उद्गार महाराष्ट्र कॉस्मोपोलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्ष अबेदा इनामदार यांनी काढले.
युवक क्रांती दल, भारतीय समाज विकास व संशोधन संस्था आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, सत्याग्रही विचारधारा मासिकाचे संपादक, माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी २१ ऑगस्ट २०२२ रोजी ८२ व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आणि ‘डॉ. कुमार सप्तर्षी : व्यक्ती आणि कार्य : बहुआयामी परिवर्तन प्रेरणा’ या ग्रंथाचा प्रकाशन समारंभ आयोजित करण्यात आला होता. रविवार, २१ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता गांधी भवन, कोथरूड, येथे हा कार्यक्रम झाला.आबेदा इनामदार यांच्या हस्ते ग्रंथ प्रकाशन झाले.आबेदा इनामदार यांनी पन्नास हजाराचा धनादेश पुढील कार्यासाठी देणगी म्हणून यावेळी डॉ. सप्तर्षी यांच्याकडे सुपूर्द केला. डॉ कुमार सप्तर्षी यांच्यावरील टपाल तिकिटाचे प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते झाले.
डॉ. अंजली सोमण यांनी संपादकीय मनोगत व्यक्त केले. या ग्रंथाचे संपादन त्यांनी केले आहे. नीलम पंडीत यांनी ‘ संविधानाच्या ‘ प्रास्ताविकेचे वाचन केले. कॉन्टिनेन्टल प्रकाशनच्या प्रकाशक अमृता कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करून डॉ.सप्तर्षी यांना शुभेचछा दिल्या.संदीप बर्वे यांनी सूत्रसंचालन केले. उद्योजक कल्याण तावरे, गांधी भवनचे सचिव अन्वर राजन ,डॉ.उर्मिला सप्तर्षी , डॉ.प्रवीण सप्तर्षी,डॉ.कबीर उमा कुमार,हेमंत गोखले,विवेक पुरंदरे,डॉ.उल्हास बापट,पी.डी.जोशी,डॉ.मिलिंद तायडे,जांबुवंत मनोहर,रवींद्र धनक,अप्पा अनारसे,सचिन पांडूळे,सुदर्शन चखाले सर्व क्षेत्रातील मान्यवर, हितचिंतक मोठया संख्येने उपस्थित होते.प्रसिध्द निवेदक सुधीर गाडगीळ यांनी डॉ.कुमार सप्तर्षी यांची खुसखुशीत आणि खुमासदार शैलीत प्रकट मुलाखत घेतली .त्यातून डॉ.सप्तर्षी यांच्या जीवनाचे पैलू उलगडत गेले.
डॉ. कुमार सप्तर्षी जीवन गौरव समिती,युवक क्रांती दल, महाराष्ट्र आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सर्व संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
मनोगत व्यक्त करताना डॉ कुमार सप्तर्षी यांनी त्यांच्या जीवन संघर्षातील प्रसंगांचा आढावा घेतला म्हणाले,’सत्याचे दर्शन होण्यासाठी सर्व बाजू माहित होणे आवश्यक आहे. आयुष्य हे सत्याचे दर्शन होण्याचे माध्यम आहे.मलाही आशयपूर्ण जगण्यासाठी आणखी जगावे असे वाटते. पण मोदींची सत्ता गेल्याशिवाय ते शक्य नाही.म्हणून मोदींची सत्ता घालविण्याचे आमचे प्रयत्न सुरु राहतील. खासगीकरणानंतरच्या काळात भांडवलदारांचे पोलिटिकल एजंट राज्य करू लागले आहेत.ते जनतेला धाकात ठेवू लागले आहेत.राजकीय व्यवस्था सर्वोच्च राहिलेली नसून भांडवलदार सर्वोच्च झाले आहेत.फॅसिस्ट रचना आणली जात आहे.हिंसा आवडावी असा प्रयत्न चालू आहे.त्याविरोधात मोठा लढा द्यावा लागणार आहे.