शबनम न्युज | मुंबई
सध्या राज्याच्या राजकारणात शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरुन वाद निर्माण झाला आहे. सत्ताधारी आणि विरोधी एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहे. आज शिंदे गटाचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर बोलताना पाटील यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. दसरा मेळाव्याचा विषय प्रलंबित असून आम्ही परवानगी मागितल्याचं पाटील यांनी सांगितलं.
आदित्य ठाकरेंनी टीका करताना आमच्या वयाचा विचार करावा, नाहीतर आम्ही बोलण्यामध्ये एवढे कठीण आहोत की तुम्हाला आवरणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला आहे. या अगोदरही पाटीलांनी आदित्यच्या टीकेवर पलटवार केलं होत. ते गोधडीत होतं, तेव्हा आम्ही शिवसैनिक होतो, असं ते म्हणाले होते. त्यांनतर आजही पदभार स्वीकारल्यांनंतर ही पाटीलांनी आदित्यवर टीकास्त्र सोडलं आहे.
बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आम्हीच –
गुलाबराव पाटील यांनी पदभार स्वीकारल्यांनंतर बोलताना म्हणाले, बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार आम्हीच आहोत. आदित्य ठाकरे हे त्यांच्या प्रॉपर्टीचे वारसदार होऊ शकतात विचारांचे नाहीत. आदित्य यांना एकट्याला आमदार होण्यासाठी दोन विधानपरिषद द्याव्या लागल्या आहेत. जर, तुम्हीच खरे वारसदार होता मग दोन एमएलसी का दिल्यात? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी विचारला.