पुणे | शबनम न्यूज
आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने साक्षरता जागृती करण्याच्या हेतूने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. सुशीलकुमार गुजर यांनी मार्गदर्शन करतांना आज आपण एकविसाव्या शतकात असून अजूनही साक्षरता प्रचार प्रसार करण्याची गरज असल्याचे सांगितले. जगातील अनेक देशांमध्ये आजही साक्षरता खूपच कमी आहे. किंबहुना भारतासारख्या विकसनशील राष्ट्रांमध्ये बिहारसारख्या राज्यात स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रश्न आजही गंभीर आहे. जोपर्यंत निरक्षरतेचे संपूर्ण उच्चाटन होत नाही, तोपर्यंत असे दिवस साजरे करणे व त्यामार्फत जागृती निर्माण करणे हे युवकांचे पहिले कर्तव्य असले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून दरवर्षी युनोस्कोमार्फत आंतरराष्ट्रीय स्तरावर ८ ऑगस्ट हा जागतिक साक्षरता दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरविले गेलेले आहे. युनेस्कोमार्फत यावर्षीचे साक्षरता दिवसाचे घोषवाक्य म्हणून संदेश देण्यासाठी ‘ट्रांसफॉर्मिंग लिटरेसी लर्निंग स्पेस’ (Transforming Literacy Learning Spaces) असे ठरविले गेले आहे. त्याचे पालन प्रत्येक युवकांनी केले पाहिजे. पुण्याची स्थिती आजही फारशी चांगली नाही. या शहरांमध्ये सुमारे २५० विद्यार्थी शालाबाह्य आहेत. त्यावरून आपण सामूहिक प्रयत्न करून प्रत्येकाने युनोस्कोच्या या कार्यामध्ये आपला वाटा उचलला पाहिजे असे सांगितले.
तर अध्यक्षपदावरून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. अरुण आंधळे यांनी रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विसाव्या शतकाच्या सुरुवातीलाच साक्षरता प्रसाराची गरज ओळखून शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून गोरगरिबांसाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबरोबरच या साक्षरता दिनाच्या निमित्ताने आपल्याला कर्मवीर भाऊराव पाटील यांना विसरून चालणार नाही. त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून आपण शिक्षणाचे कार्य पुढे चालू ठेवले पाहिजे व प्रत्येक व्यक्ती जोपर्यंत साक्षर होत नाही, तोपर्यंत आपण हे काम करीत राहिले पाहिजे असे त्यांनी सुचविले. आज महाराष्ट्र राज्य इतर राज्यांच्या तुलनेत शैक्षणिक दृष्ट्या पुढारलेला आहे. याचे सर्व श्रेय रयत शिक्षण संस्था व कर्मवीर भाऊराव पाटील तसेच त्यांच्याबरोबर काम करणारे सर्व कार्यकर्ते यांना जाते, असे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसनही करून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रभंजन चव्हाण यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. रेश्मा दिवेकर यांनी मानले महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रमेश रणदिवे, प्रा. चंद्रकांत बोरुडे व ६५ विद्यार्थी कार्यक्रमाला उपस्थित होते.