वाढत्या विरोधामुळे प्रशासन झुकलं; नागरिकांच्या लढ्याला यश – अनुप मोरे
शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महापालिकेने घनकचरा व्यवस्थापनांतर्गत प्राधिकरणातील सेक्टर क्रमांक २६, स्वप्नपूर्ती सोसायटीलगत कचरा संकलन केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, नागरिकांच्या वाढत्या विरोधामुळे हे केंद्र पर्यायी जागेत स्थलांतरीत करावे, अशी आमची आग्रही मागणी होती. त्यासाठी माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे आणी मी सनदशीर मार्गाने पालिका प्रशासनाकडे गेली काही महिने लेखी, तोंडी विनंती केली, प्रसंगी आंदोलनाचा पवित्रा घेतला. आज या लढ्याला यश आले असून, पालिका प्रशासने प्रस्तावित जागेतून निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथे कचरा संकलन केंद्र स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाढत्या विरोधामुळे प्रशासन झुकलं असून नागरिकांच्या लढ्याला यश आले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपचे युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे यांनी दिली.
अनुप मोरे म्हणाले, सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिने प्राधिकरणात कचरा केंद्र नको, यासाठी आमचा सुरुवातीपासूनच विरोध होता. त्यासाठी वाटेल ती किंमत मोजण्याची नागरिकांची भूमीका होती. कचरा केंद्राचे काम बंद व्हावे यासाठी सनदशीर मार्गाने विरोध सुरु होता. मात्र बहि-या प्रशासनाला नागरिकांचा आवाज ऐकू येत नव्हता. मात्र, प्राधिकरणाची कचरा पेटी होवू द्यायची नाही, यासाठी आमचे प्रयत्न सुरु होते.
गुरुवारी (दि. २२) रोजी पालिकेचे अधिकारी संबधित ठिकाणी कामासाठी आले असता माजी उपमहापौर शैलजाताई मोरे, सामाजिक कार्यकर्ते निलेश शिंदे आणी प्रभागातील नागरिकांसह आम्ही घटनास्थळी पोहोचलो. अधिकाऱ्यांना नागरिकांच्या मतांचा विचार करून संबधित केंद्र इतर ठिकाणी स्थलांतरीत करण्याची सूचना केली. त्यावेळी अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे नागरिकांचा संताप वाढला. मात्र, महापालिका आयुक्तांची भेट घेऊन त्यांना वस्तूस्थिती समजावून सांगितली. राष्ट्रीय हरित लवादाचा संदर्भ देत इतर पर्यायी जागेवर कचरा संकलन केंद्र सुरु करण्याबाबत मागणी केली. या मागणीची दखल घेत आज महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी सबंधित केंद्र निगडीतील ट्रान्सपोर्टनगर येथे स्थलांतरीत करण्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत, असे अनुप मोरे म्हणाले.
निलेश शिंदे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरातील कचरा प्राधिकरणात आणून महापालिका प्रशासन नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणू पाहत होते. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असती. येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायमचा निर्माण होणार होता. त्यामुळे हे कचरा केंद्र इतर पर्यायी जागेत हलविण्यासाठी आम्ही पाठपुरावा केला. त्याला आज यश आले. महापालिका आयुक्त शेखर सिंह यांचे आम्ही आभार मानतो.