पक्ष संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने जयंत पाटील यांची दौऱ्याला सुरुवात
शबनम न्युज | जळगाव
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्ष संघटना बळकट करण्याच्या दृष्टीने आजपासून पुन्हा नव्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. जळगाव जिल्हा शहर व ग्रामीण भागाच्या कार्यकारिणीची पहिली आढावा बैठक नुकतीच संपन्न झाली. आगामी निवडणुका लक्षात घेऊन जिल्ह्यात पक्षसंघटना मजबूतीने कार्यरत राहण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पूर्णपणे सतर्क झाले आहेत. या आढावा बैठकीला माजी मंत्री तसेच आमदार एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी, जिल्हाध्यक्ष रविंद्र भैय्या पाटील, मा.आ. सतिश पाटील, मा.आ. राजीव देशमुख,आ. दिलीप वाघ, रोहिणीताई खडसे, महिला जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. ते म्हणाले की, प्रत्येकाने पक्ष वाढवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. जास्तीत जास्त कार्यशील सदस्यांची नोंद कशी होईल यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करायला हवा. जे लोक १० रुपयांची पावती फाडतात आणि तनामनाने काम करतात अशा लोकांपर्यंत जावून सभासद नोंदणी यशस्वी करा अशी सूचना त्यांनी कार्यकर्त्यांना केली. निवडणुकांसाठी फार कमी अवधी राहीला आहे. आपण सध्या सरकारमध्ये नसलो तरीही आपण जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचू शकतो, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये रुजवला. जो जास्त काम करेल त्यालाच पक्षात स्थान दिले जाईल त्यामुळे प्रामाणिकपणे सभासद नोंदणी करा. या मोहिमेत मला थोडाही ढिसाळपणा चालणार नाही, सर्वांनी यात उत्साहाने सहभागी झाले पाहीजे असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले.
आपली सत्ता गेली तरी सत्व शाबूत आहे. राज्यात सत्तांतर झाले असले तरी लोकांची आपुलकी आणि विश्वास हा सत्ताधाऱ्यांपेक्षा विरोधकांवर जास्त आहे. आपण स्वाभिमान जपला म्हणूनच हक्काने लोकांच्या समोर जावू शकतो. यातूनच लोकांच्या आशीर्वादाने पुन्हा सत्तेत येवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पुढे प्रदेशाध्यक्षांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील युवक सरकारवर नाराज आहेत, फॉक्सकॉन प्रकल्प सरकारच्या हातून गेला आणि तरुणांच्या हातून रोजगार गेला. देशभरात बेरोजगारीची संख्या तसेच महागाई वाढते आहे. लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे. लोक आपल्याला भरभरून देण्याच्या तयारीत आहेत आपण आपला पदर मोठा करायला हवा. संघटना मोठी झाली तरच ते शक्य होईल असे ते म्हणाले.