शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, राजस्थानचे राज्यपाल अशी विविध पदे भूषविणारे वसंतदादा पाटील हे बहूआयामी मुत्सद्दी राजकीय नेते तर होतेच याशिवाय भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील थोर सेनानी देखील होते. महाराष्ट्र राज्याच्या जडणघडणीत त्यांनी दिलेले योगदान महत्त्वपूर्ण ठरणारे आहे, असे प्रतिपादन महापालिकेचे विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी केले.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने त्यांच्या सांगवी येथील पुतळ्यास विशेष अधिकारी किरण गायकवाड यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते. जुनी सांगवी येथील झालेल्या या कार्यक्रमास उप अभियंता संतोष दुर्गे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, विकास घोरपडे , सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय नलावडे, रवी भोसले, संतोष कदम, धनंजय कातोरे, चुनीलाल धनाने, माऊजी सापरिया तसेच सांगवी परिसरातील नागरिक उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यात जन्म झालेल्या वसंतदादा पाटील यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य चळवळीत सामील होऊन ब्रिटिशांविरुद्ध आवाज उठवण्याचे काम केले. त्यासाठी त्यांना तीन वर्षांचा तुरुंगवास झाला. महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर त्यांनी १९७७ मध्ये मुख्यमंत्रीपद भूषविले. महाराष्ट्राचे नेतृत्व करताना अनेक समाज हिताचे व दूरगामी परिणाम साधणारे निर्णय त्यांच्या काळात घेण्यात आले. पाणी अडवा,पाणी जिरवा हे सूत्र पाटील यांनी महाराष्ट्रासमोर आणले. शैक्षणिक क्षेत्रात वैद्यकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन विद्यालये विनाअनुदान तत्त्वावर स्थापनेचा निर्णय असो अथवा शालेय विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास, शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज पुरवठा ,इत्यादी महत्वाचे धाडसी निर्णय त्यांनी त्यांच्या कारकीर्दीत घेतले. महाराष्ट्राच्या उभारणीमध्ये त्यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून ग्रामीण विकास, कृषी विकास व कृषी उद्योग विकास साधण्याचा यशस्वी प्रयत्न केला. कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय,खत कारखाने, सूत गिरण्या,कागद कारखाने,सिमेंट पाईपचे उद्योग त्यांनी सहकारी तत्त्वावर सुरू केले.अशा या थोर समाजसेवकाचा वारसा सर्वांनी जोपासला पाहिजे, असे विशेष अधिकारी गायकवाड म्हणाले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.