शबनम न्युज | पिंपरी
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सर्व समावेशक लोकशाही राष्ट्र उभे करण्यासाठी सतत कार्यरत असणारे आधुनिक भारताचे शिल्पकार होते, त्यांच्या धर्मनिरपेक्ष व मानवतावादी दृष्टिकोनातून देशाच्या विकासाची चाके अधिक गतीमान झाली असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी मुख्य प्रशासकीय भवनात त्यांच्या प्रतिमेस तसेच नेहरूनगर येथील त्यांच्या पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यावेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमास उप आयुक्त रविकिरण घोडके,विशेष अधिकारी किरण गायकवाड, कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप,माजी नगरसदस्य राहुल भोसले,माजी नगरसदस्या अनुराधा गोरखे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, खुशाल पुरंदरे, सामाजिक कार्यकर्ते विनोद गायकवाड उपस्थित होते.
देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळात देशात बनविलेल्या स्वदेशी वस्तूंचा वापर आणि विदेशी वस्तूंचा त्याग करून इंग्रजांविरुद्धच्या लढ्यात सहभागी झालेल्या पंडित नेहरू यांनी अनेक वर्ष तुरुंगवास भोगला.देशातील स्वतंत्र झाल्यानंतर नेहरू यांनी आर्थिक,सामाजिक आणि राजकीय सुधारणांसाठी महत्वाकांक्षी कार्यक्रम सुरू केले.त्यांच्या महत्वपूर्ण कामगिरीबद्दल भारत सरकारने त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान बहाल केला. त्यांच्या कार्याचे स्मरण करून देशाला बलशाली बनविण्यासाठी सर्वांनी योगदान दयावे असे आवाहन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.