शबनम न्युज | नागपूर
आज हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी अधिवेशनात विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभा अध्यक्ष सरकारला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत सभात्याग केला. आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी भाजप सरकारच्या कालावधीत विधिमंडळातील सदस्यांसह अनेक मान्यवरांचे फोन बेकायदेशीरपणे टॅपिंग केले. यामुळे विधिमंडळाच्या सदस्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच झाला असून लोकशाहीला धोका निर्माण झाला आहे. या फोन टॅपिंग प्रकरणाचा मास्टर माईंड कोण आहे? कोणाच्या आदेशाने हे फोन टॅपिंग करण्यात आले? आता रश्मी शुक्ला यांना वाचविण्याचा कोण प्रयत्न करत आहे ? ही माहिती सभागृहाच्या समोर आणण्याची आग्रही मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली. याकडे दुर्लक्ष करत अध्यक्षांनी कामकाज पुढे रेटण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानसभा अध्यक्ष सरकारला पाठीशी घालत असल्याचा आरोप करत सभात्याग केला.
तसेच अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधकांच्या वतीने विधान भवन परिसरात आंदोलन करण्यात आले. विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्यांवर येत ईडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘घेतले खोके, भूखंड ओके’, ‘दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे’, ‘राज्यपाल हटाव, महाराष्ट्र बचाव’, ‘धिक्कार असो, धिक्कार असो, मिंधे सरकारचा धिक्कार असो’, ‘बेळगाव, कारवारसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, ‘भूखंडाचा श्रीखंड खाणार्या सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देत हिवाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान भवन परिसरात आंदोलन केले.