संपादकीय | रेहान सय्यद
महाराष्ट्रातील एकूण १९ महानगरपालिका निवडणूक २०२२ मध्ये होणे अपेक्षित होते. परंतु पहिले महाराष्ट्रातील ठाकरे सरकार व नंतरचे शिंदे सरकार यांनी ओबीसीचा मुद्दा याला प्राथमिकता देऊन जोपर्यंत ओबीसी राजकीय आरक्षण घोषित होत नाही, तोपर्यंत कोणत्याही निवडणुका घेतल्या जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली. त्यामुळे महानगरपालिका निवडणुका संपूर्ण महाराष्ट्रात पुढेच ढकलत गेल्या, पिंपरी चिंचवड शहरातील महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारीच्या २०२२ मध्ये होणार होती, महानगरपालिकेचा कार्यकाळ हा फेब्रुवारीमध्ये संपला. परंतु महानगरपालिकेची निवडणूक झाली नसल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर प्रशासक नेमण्यात आले. महानगरपालिकेचे आयुक्त हेच प्रशासक म्हणून महानगरपालिकेचा कारभार फेब्रुवारी २०२२ पासून आजतागायत पाहत आहेत. प्रशासकपदी सर्वप्रथम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी आठ महिने प्रशासक पदावर राहून पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाची कामे पाहिली, त्यांच्यानंतर आलेले आयुक्त शेखर सिंह हे आता प्रशासक पदाचा कार्यभार सांभाळत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेवर प्रशासकीय कारभार सुरू आहे. प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी महानगरपालिका वतीने पूर्वी प्रत्येक सोमवारी जनसंवाद सभा प्रभाग निहाय कार्यालयात घेतल्या जात होत्या. परंतु आता महानगरपालिका वतीने महिन्यातून दोन वेळा जनसंवाद सभा घेतल्या जात आहेत. या जनसंवाद सभेमध्ये प्रभाग निहाय सामान्य जनतेची प्रश्न सोडविली जातात, प्रभागातील सामान्य नागरिक अथवा त्या प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते किंवा माजी नगरसेवक हे या जनसंवाद सभेमध्ये सहभाग घेऊन आपापल्या प्रभागातील आणि अडचणी मांडण्याचा प्रयत्न करतात व त्या आणि अडचणी सोडविण्याचे काम हे प्रशासकीय अधिकारी करत असतात.
परंतु लोकशाही बळकट व्हावी, याकरिता सार्वत्रिक निवडणुका होणे गरजेचे असते पण सरकारच्या धोरणानुसार २०२२ मध्ये या निवडणुका दिवसेंदिवस पुढे ढकलत गेल्यामुळे राजकीय नेते, नगरसेवक, भावी नगरसेवक, इच्छुक उमेदवार, प्रत्येक पक्षाचे नेते, कार्यकर्ते, प्रमुख यांना २०२२ मध्ये या निवडणुकांसाठी थांबावे लागले बऱ्याच इच्छुकांच्या आशा या २०२२ मध्ये अपूर्ण राहिल्या हे झाले राजकीय नेत्यांची दुःख. परंतु सामान्य जनता ही या निवडणुका न झाल्याने संतप्त आहेत. या जनसंवाद सभा घेतल्या जात असल्या तरी सामान्य नागरिकांचे प्रश्न जसेच्या तसे आहेत. जनसंवाद सभेमध्ये सामान्य नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी आपापल्या प्रभागातील लोकप्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ते हे या जनसंवाद सभेमध्ये सहभाग घेऊन आपली गाऱ्हाणी मांडत असतात, परंतु त्यांनी मांडलेली गाऱ्हाणी या कितपत प्रशासकीय कार्यकाळात ऐकली गेली व किती अडीअडचणी सोडविल्या गेल्या या प्रश्नावर अजूनही प्रश्नचिन्हच आहे.
सामान्य नागरिकांना दैनंदिन अडचणींचा सामना करावा लागतोय, मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागत आहे परंतु या महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभारात सामान्य नागरिकांची प्रश्ने या ज्या तीव्रतेने ऐकायला पाहिजे होती ज्या तीव्रतेने त्यांचे प्रश्न सोडवायला पाहिजे होते, त्या तीव्रतेने ते प्रश्न सोडविले जात नसल्याचे नागरिकांच्या वतीने सांगण्यात येत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत मोठी विकास कामे होत आहेत परंतु स्मार्ट सिटी अंतर्गत होणाऱ्या या विकास कामांमध्ये अनेक प्रकारचा भ्रष्टाचार ही समोर आला आहे. या सर्व प्रकारांना आळा बसविण्यासाठी निवडणुका होणे अत्यंत आवश्यक आहे.
लोकप्रतिनिधींचा वचक हा शासकीय अधिकाऱ्यांवर असतो, त्यामुळे सामान्य जनतेची कामे ही लवकर होतात. जर महानगरपालिकेची निवडणूक वेळेवर झाली असती तर आपापल्या प्रभागातील नगरसेवक हे आपापल्या प्रभागातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्यास पुढे आले असते. सामान्य नागरिक हा प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे आपली तक्रार कशी घेऊन जावी?कसे आपले प्रश्न सोडवावे? यासाठी जितका जागरूक पाहिजे तितका जागरूक आजही नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींशिवाय प्रभागातील समस्या सोडविणे खूप मोठ्या अडचणीचे ठरत आहेत. या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या असत्या तर नागरिकांना आपापल्या प्रभागातील नगरसेवकांकडे जाब विचारण्यासाठी जागा राहिली असती, परंतु आता जाब कोणाला विचारावे, कशाप्रकारे आपल्या प्रभागातील अडचणी सोडविण्यात याव्या, हा एक मोठा प्रश्न सामान्य नागरिकांच्या समोर आहेत.
जनसंवाद सभा महिन्याला दोन वेळा होत असताना या जनसंवाद सभेमध्ये तक्रार निवारण कितपत होते. हेही सांगणे किंवा समजणे सामान्य नागरिकांच्या आवाक्यात नाही. त्यामुळे महानगरपालिका निवडणुका जितक्या लवकर होतील तितके सामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून तसेच पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी अत्यंत आवश्यक आहे. लोकप्रतिनिधी आपापल्या प्रभागातील अडी-अडचणी सोडवीत असतात, आपापल्या प्रभागाचा विकास करणे हेच प्रत्येक लोकप्रतिनिधीचे ध्येय असते, सामान्य नागरिक ही मतदार हा आपण ज्यांना मते देऊन आपण निवडून आणले आहेत त्यांच्याकडे आपली गाऱ्हाणी मांडतात व अडीअडचणी सोडवून घेत असतात. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक येत्या काळात लवकर व्हावी, अशी मागणी सामान्य नागरिकांच्या वतीने तसेच प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या वतीने होत आहेत.