लोकप्रतिनिधींना डाऊन करण्यासाठीच सरकार काम करतंय
शबनम न्युज | मुंबई
“राज्यात सत्तेचा गैरवापर सुरू आहे. लोकप्रतिनिधींना डाऊन करण्यासाठीच सरकार काम करत आहे,” अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केली. काही दिवसांपूर्वी राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख प्रदीर्घ कालावधीनंतर जामिनावर सुटले. यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना शरद पवार यांनी शिंदे- फडणवीस सरकारला चांगलेच सुनावले.
शरद पवार म्हणाले, “सत्तेचा गैरवापर होतोय. संजय राऊत आणि अनिल देशमुखांबाबत न्यायालयाने निर्णय घेतला. काही सदस्य आतमध्ये आहे. त्यांनाही न्याय मिळेल. जामीन हा हक्क आहे. ज्या कारणाने या लोकांना आत टाकले त्यात फारसे काही दिसत नाही, हा निष्कर्ष न्याय देवतेने काढला आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करून गेल्या काही महिन्यांपासून लोकप्रतिनिधींना डाऊन करण्याचे काम करण्यात आल्याचे स्पष्ट दिसते,” या शब्दांत शरद पवार यांनी शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला.