‘जनजागर यात्रा…सावित्रीच्या लेकींचा…’ या यात्रेचा शरद पवार यांच्या हस्ते शुभारंभ
शबनम न्युज | पुणे
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्यावतीने आयोजित महागाईच्या विरोधात व बेरोजगारी विरोधात ‘जनजागर यात्रा…सावित्रीच्या लेकींचा…’ या यात्रेचा शुभारंभ बुधवार (दि.४) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या हस्ते पुणे येथे करण्यात आला. यावेळी शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेच्या महिला आघाडीने कृतज्ञतापूर्वक सत्कार केला.
खा. शरद पवार यांनी यावेळी सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, “मला आनंद आहे की, या जागर कार्यक्रमातून तुम्ही गावोगावी जाऊन सांगणार आहात की इथला शेतकरी कष्ट करतोय, उत्पादन वाढवतोय पण सामान्य माणसाच्या डोक्यावरील महागाईचे संकट या सरकारच्या आर्थिक धोरणामुळे आहे. त्यामुळे जे आम्हाला महागाईत टाकतात त्यांना आम्हाला संधी द्यायची नाही.”
“जातीजातीत अंतर कसे वाढेल याची खबरदारी घेतली जाते. काहीतरी प्रश्न काढून दोन समाजात विद्वेष कसा वाढेल याची काळजी घ्यायची. हे का तर त्यांनी जी निवडणुकीच्या काळात आश्वासन दिली त्याची कोणतीही गोष्ट करण्याची अथवा कृतीत आणण्याची धमक यांच्यामध्ये नाही त्याचा परिणाम याबद्दल लोकांची नाराजी येऊ नये म्हणून लोकांना अन्य ठिकाणी लक्ष केंद्रीत करायला लावण्यासाठी कधी जातीचे, धर्माचे, भाषेचे नाव घेतात. यातून समाजात अंतर वाढविण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका पवार म्हणाले.”
तसेच यावेळी बोलताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा खासदार फौजिया खान म्हणाल्या, “हजारो वर्षांपासून महिला दुय्यम दर्जाचे जीणं जगते आहे. प्रत्येक युगात स्त्रियांना बरोबरीचे स्थान मिळण्यासाठी अनेक महापुरूषांनी लढा दिला. आजच्या युगात आपल्या साहेबांनी शासकीय धोरण आणून या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण विकास करण्याचे काम केले. साहेबांच्या या कार्याला सन्मान करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, असे खासदार फौजिया खान म्हणाल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष विद्याताई चव्हाण मार्गदर्शन करताना म्हणाल्या, “आजचा कार्यक्रम रस्त्यावरची लढाई सुरु करण्यासाठी आहे. मागील आठ वर्ष ज्यांनी वेगवेगळी वचन दिली मात्र या संपूर्ण कालखंडात कोणतेही वचन पूर्ण करण्यात आले नाही. त्यामुळे महागाई, बेरोजगारी या विषयांवर बोलून आपल्याला जनतेला जागरुक करायचे आहे. या जागराची सुरुवात आदरणीय पवार साहेब हिरवा झेंडा दाखवून करणार आहेत. देशात वाढलेली महगाई, रोजगार नाहीत, मात्र यावर न बोलता जातीवाद निर्माण करण्याचे काम सुरु आहे. आम्ही सावित्रीच्या लेकी आजपासून जागर करत आहेत, जागर महागाई विरोधात, बेरोजगारी विरोधात, अत्याचाराविरोधात आहे,” असे विद्याताई यांनी सांगितले.