शबनम न्युज | मुंबई
बऱ्याच दिवसांपासून शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामधील युतीची जोरदार चर्चा सुरु आहेत. परंतु या युतीला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाचा छुप्या पद्धतीने विरोध असल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान, “आम्ही अधिकृतपणे महाविकास आघाडीच्या नेत्यांना या युतीची माहिती दिली आहे. त्यांनी युती जवळपास निश्चित केली” असल्याचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.
पुढे खासदार राऊत म्हणाले, “शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी युतीसाठी चर्चा करत आहेत. आम्ही अधिकृतपणे महाविकास आघाडीच्या नेत्यांना याची माहिती दिली आहे. त्यांनी युती जवळपास निश्चित केली आहे, शिवशक्ती आणि भीम शक्ती एकत्र आल्यास देशाच्या राजकीय परिस्थितीत आमूलाग्र बदल घडून येईल. जर दोन्ही शक्ती एकत्र आल्या तर देशात मोठ्या बदलाची प्रक्रिया सुरू होईल,” असे ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले, “प्रकाश आंबेडकर हे वर्षानुवर्षे राजकीय क्षेत्रात आहेत आणि ते अत्यंत प्रतिष्ठित व्यक्ती आहेत. प्रकाश आंबेडकर आणि त्यांच्या वंचित बहुजन आघाडी यांच्या नेतृत्वाखाली दलित समाज एकवटला आहे. त्यांना राजकीय जीवनाच्या मुख्य प्रवाहात येण्यापासून कोणी रोखू शकेल, असे आम्हाला वाटत नाही.” “वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये सामील होण्यास काही विरोध असू शकतो, पण तो विरोध चर्चेद्वारे सोडवता येऊ शकतो,” असे खा. राऊत म्हणाले.
नुकतेच प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकारांशी बोलताना शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी, मुंबई नागरी संस्थांच्या निवडणुका तसेच भविष्यातील इतर सर्व निवडणुका एकत्रितपणे लढविणार असल्याचा निर्णय घेतला असल्याचे वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते कि, “शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आमच्या आघाडीत घेण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला कळले आहे कि, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष या युतीला छुप्या पद्धतीने विरोध करत आहे. ते याला विरोध करत आहेत कारण त्यांना गरिबांना सत्तेपासून दूर ठेवायचे नाही” असे प्रकाश आंबेडकर म्हणाले होते.