शबनम न्युज | मुंबई
“जेव्हापासून शिंदे-फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आले, तेव्हापासून लोकशाही संपली आणि सैतानी साम्राज्याचा उदय झाला. याच जिवंत उदाहरण आज बघायला मिळालं,” अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी शिंदे सरकारवर केली आहे.
अकोल्यातील पाणीपुरवठा योजनेवरील स्थगिती उठवण्याच्या मागणीसाठी बाळापूरचे आमदार नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर अशी ‘जलसंघर्ष’ यात्रा काढली होती. ही यात्रा आज नागपूरमध्ये दाखल होणार होती. मात्र, पोलिसांनी त्यांची ‘जलसंघर्ष’ यात्रा मध्येच अडवली. यावेळी आमदार नितीन देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, या प्रकरणावरून महाविकास आघाडीतील नेत्यांकडून शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान, मिटकरी यांच्याकडूनही या घटनेवरून शिंदे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आले आहे.
मिटकरी म्हणाले, “पिण्याच्या पाण्यासाठी अकोला ते नागपूर पायी संघर्ष यात्रा काढणारे नितीन देशमुख यांच्यावर बेकायदेशीरपणे कारवाई करण्यात आली. त्यांना चुकीच्या पद्धतीने अटक केली गेली. हीच सैतानी साम्राज्याची सुरुवात आहे. पण शिंदे-फडणवीस सरकारने हे लक्षात ठेवावं की चार दिवस सासूचे आणि चार दिवस सूनेचे असतात. ज्या दिवशी महाविकास आघाडी सत्तेत येईल, तेव्हा हिशोब केला जाईल,” अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली.