शबनम न्युज | मुंबई
भारतीय जनता पक्ष जनतेच्या हितासाठी नसून, शेतकरी, तरुण, महिला, कामगार व जनता विरोधी आहे. विकासाला काँग्रेसचा विरोध नाही, पण स्थानिकांना उध्वस्त करणारा प्रकल्प असेल तर स्थानिक जनतेच्या त्या प्रकल्पाला विरोध असेल तर त्यांच्याशी चर्चा करून संवादातून मार्ग काढला जाऊ शकतो. जनतेच्या मनात जर रिफायनरी प्रकल्पाबाबत काही शंका असतील तर भाजपा सरकार स्थानिक जनतेच्या शंकाचे निरसन का करत नाही, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले, पोलिसांचा फौज फाटा घेऊन कसले सर्वेक्षण करता, ही दादागिरी, हुकूमशाही चालू देणार नाही. आम्ही सर्वजण कोकणातील स्थानिक जनतेच्या बरोबर आहोत, अशी ग्वाही नाना पटोले यांनी दिली.
रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पोलीस बळाचा वापर करून सर्वेक्षण केले जात आहे. या पोलीस दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून, पोलीस बळावर कोणाचा विकास साधायचा आहे. स्थानिक जनतेला विश्वासात न घेता प्रकल्प लादणे ही हुकूमशाही असून कोणत्याही परिस्थितीत भाजप सरकारची ही दादागिरी सहन केली जाणार नाही, बारसू रिफायनरीसाठी जनतेवर दंडेली कराल तर याद राखा, असा खणखणीत इशारा देखील नाना पटोले यांनी दिला आहे.