शबनम न्युज | पिंपरी
“सृष्टी असेपर्यंत सनातन हिंदू अस्तित्वात राहील! देशातील ९५ कोटी हिंदूंपैकी पाच कोटी लोक जेव्हा सनातन हिंदू म्हणून वागतील त्याच दिवशी हे राष्ट्र हिंदुराष्ट्र होईल!” असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ प्रांगण, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे गुरुवार, दिनांक ०४ मे २०२३ रोजी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आयोजित पाच दिवसीय छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेत ‘हिंदू समाज की आज की चुनौतियॉऺ’ या विषयावरील चतुर्थ पुष्प गुंफताना पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ बोलत होते. टीजीएसबी बँकेचे एजीएम राकेश वाल्मीकी, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे अध्यक्ष के. विश्वनाथन नायर, कार्याध्यक्ष रमेश बनगोंडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ पुढे म्हणाले की, “लोकांची पदं पाहून त्यांना सन्मान देण्याची प्रथा रूढ झाली आहे; परंतु जितक्या मोठ्या पदावरील व्यक्ती, तितकेच ती मोठ्या प्रमाणावर खोटे बोलते. महात्मा गांधी खूप महान होते. त्यांच्याप्रति माझ्या मनात पराकोटीचा आदर आहे. काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या कार्यकारिणी निवडणुकीत सरदार वल्लभभाई पटेल यांना पंधरापैकी बारा मते मिळाली होती. मात्र, महात्मा गांधी यांनी तिथे वल्लभभाई पटेल यांच्या हाती एक चिठ्ठी दिली आणि जवाहरलाल नेहरू निवडणूक प्रक्रियेत सहभागी नसतानाही अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करण्यात आली होती. ३१ ऑगस्ट १९३३ रोजी भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून जगातील नऊ देशांनी मान्यता देऊन सुभाषचंद्र बोस यांची निवड करण्यात आली होती. १५ ऑगस्ट १९४७ रोजी देश स्वतंत्र झाला हे सर्वात मोठे असत्य आहे; कारण २८ एप्रिल १९४८ रोजी जवाहरलाल नेहरू यांनी ब्रिटिश सरकारला पत्र लिहून राजगोपालाचारी यांना गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त करण्याची परवानगी मागितली होती. तथाकथित भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या वेळी लॉर्ड माउंटबॅटन हे स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते; तर पाकिस्तानने महंमद अली जिना यांना आपले पहिले गव्हर्नर जनरल म्हणून नियुक्त केले होते. भारतीय पद्म पुरस्कार पंतप्रधानांच्या संमतीने प्रदान केले जातात. १९५५ मध्ये तत्कालीन पंतप्रधानांनी स्वतःलाच पुरस्कार घेतला होता. पुढे तोच कित्ता त्यांच्या कन्येने स्वतः पंतप्रधान असताना गिरवला. लॉर्ड माउंटबॅटन यांचे निधन झाल्यानंतर संसदेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पुढे लेडी एडविना माउंटबॅटन यांच्या निधनानंतर या गोष्टीची पुनरावृत्ती करण्यात आली; परंतु भारतीय राजकारणात सर्वात मोठ्या जनआंदोलनाचे नेतृत्व करणारे जयप्रकाश नारायण यांचे निधन झाल्यानंतर संसदेत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात सोईस्कर दुर्लक्ष करण्यात आले. सावरकर, सुभाषचंद्र बोस आणि बी. आर. आंबेडकर (डॉ. बाबासाहेब आंबेडकर) हे प्रामाणिक देशनेते होते.
मुस्लीम समाज अल्पसंख्याक असल्याचा खोटा निष्कर्ष लादून त्यांच्यावर सवलतींची खैरात करीत लांगूलचालन केले जाते; परंतु जनगणनेनुसार मुस्लीम समाज हा भारतात लोकसंख्येने दुसऱ्या क्रमांकावर आहे; तर खरोखर अल्पसंख्याक असलेला पारशी समाज कोणत्याही सवलतीविना देशासाठी आपले योगदान देतो आहे. नऊ राज्यांमध्ये हिंदू समाज अल्पसंख्याक झालेला आहे. हिंदू समाज हा शांतताप्रिय आहे; आणि अन्य धर्मीयदेखील तसेच आहेत अशा भाबड्या समजुतीत आहे. आजच्या संचारक्रांतीच्या काळतही सनातनी हिंदू आपल्या मनातील गोष्टी उघडपणे बोलू शकत नसेल; तर ते खूप मोठे दुर्दैव आहे. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी, ज्या परिस्थितीत आहात तिथे व्यक्त व्हायला शिका. सत्याला सामोरे जा! बोलण्याची हिंमत करा! ‘सर तनसे जुदा’ झाले तरी चालेल; पण सनातनी हिंदूंनी आता आपल्या अस्तित्वाची लढाई लढलीच पाहिजे!” अशा परखड अन् काही वेळा उपरोधिक शैलीतून सुमारे अडीच तासांहून अधिक काळ पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांनी आपल्या विषयाची मांडणी करताना स्वातंत्र्यपूर्व अन् स्वातंत्र्योत्तर काळातील अनेक घटनांचा तपशीलवार ऊहापोह केला.
शिल्पा बिबीकर यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. उज्ज्वला केळकर यांनी सूत्रसंचालन केले.