शबनम न्युज | मुंबई
सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवारी) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल दिला आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडत असताना घडलेल्या विविध घटनांवर न्यायालयाने भाष्य केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अविश्वास ठराव चाचणी घेण्याचा जेव्हा निर्णय घेतला, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर आजचं चित्र वेगळं असतं, असंही न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत आली असती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
दरम्यान, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर महाराष्ट्राची आजची राजकीय स्थिती वेगळी असते का? असं विचारलं असता शरद पवार म्हणाले, “आता त्यावर चर्चा करण्यात काही अर्थ नाही, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्याबाबत मी माझ्या पुस्तकात लिहिलं आहे.”