शबनम न्युज | मुंबई
सर्वोच्च न्यायालयाने आज (गुरुवारी) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल दिला आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडत असताना घडलेल्या विविध घटनांवर न्यायालयाने भाष्य केलं आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अविश्वास ठराव चाचणी घेण्याचा जेव्हा निर्णय घेतला, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर आजचं चित्र वेगळं असतं, असंही न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत आली असती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, आज बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार मुंबई दौऱ्यात आहेत. त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी भेट घेऊन संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, “लोकशाहीची रक्षा करणं आपलं काम आहे. मी राजीनामा दिला नसता तर मी मुख्यमंत्री बनलो असतो, असं आज सर्वोच्च न्यायालायने म्हटलं आहे. परंतु, माझी लढाई जनतेसाठी, राज्यासाठी आणि देशासाठी आहे. आज राजकारणात वाद होत राहतात. परंतु, आपल्या देशाला आणि संविधानाला वाचवायचं आहे. आम्ही सगळे मिळून देशाला गुलाम बणवणाऱ्यांना घरी पाठवणार आहोत,” असं ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, मी दिलेला राजीनामा कायदेशीर चुकीचा असेलही. पण नैतिकतेने ज्या लोकांना माझ्या वडिलांनी पक्षात सर्वकाही दिलं त्या लोकांना माझ्यावर विश्वास किंवा अविश्वास ठरवायला कसं देऊ? असा उद्विग्न सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यांना अधिकारच नाही. त्यांना प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही. गद्दार लोक माझ्यावर अविश्वास आणतील तर मी कसा सामना करणार, असंही पुढे ठाकरे म्हणाले.