शबनम न्युज | ठाणे
योग हा मन आणि शरीर सुदृढ करण्याचा मार्ग आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपले आरोग्य सुदृढ ठेवावे, असे प्रतिपादन केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आज कल्याण येथे केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केंद्रीय पंचायती राज मंत्रालय आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने कल्याणमधील फडके मैदानात केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. माजी आमदार नरेंद्र पवार, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, इतर सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.
यावेळी पाटील, श्री. जिंदल यांच्यासह उपस्थितांनी योग प्रात्यक्षिके केली. विविध शाळांचे विद्यार्थीही मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. मोठ्या संख्येने नागरिक, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी योग प्रात्यक्षिकेमध्ये सहभागी झाले होते. डॉ. संध्या यांनी उपस्थितांकडून योगाची प्रात्यक्षिके करून घेतली. यावेळी विविध संस्थानी देखील सहभाग नोंदविला. शालेय विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वरचित कविता ‘क क कवितेचा’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले.