शबनम न्युज | इर्शाळवाडी
आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडीतील दुर्घटनेत बचावलेल्या नागरिकांची भेट घेतली. तसेच पुनर्वसन होईपर्यंत तुमच्या पाठीशी आहोत, जोपर्यंत तुम्हा सगळ्यांचे पुनर्वसन होत नाही, तुमची आयुष्य मार्गी लागत नाही, तोपर्यंत आम्ही सगळे तुमच्या मदतीसाठी आहे, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले. तसेच यामध्ये कुठेही राजकारण येऊ देणार नाही, असेही आश्वासन ठाकरेंनी ग्रामस्थांना दिले.
खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावातील 46 घरांपैकी 17 ते 18 घरांवर दगड कोसळयाची घटना २० जुलै रोजी घडली. या वाडीत 231 नागरिक होते. दुर्घटनेत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे, तसेच 67 नागरिकांना निवारा केंद्रात ठेवले असून, 105 जण अजून बेपत्ता आहेत. आठ जखमींवर एमजीएम व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुर्घटनेत बचावलेल्या नागरिकांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्षे झाली तरी अनेक आदिवासी, जमाती अशा पद्धतीचे जीवन जगत आहेत. त्यामुळे आता आदिवासी जमातीला प्रवाहात आणण्याची गरज आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील ज्या काही अशा पद्धतीच्या वस्त्या आहेत, त्यांची पुनर्वसन व्हायला हवे, असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले. या लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना लागू करा, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली. तर सरकार आले किंवा गेले तरी या योजनेला स्थगती देऊ नका, अशी ही मागणी त्यांनी केली.