शबनम न्युज | पिंपरी
वाकड भागातील सर्वच प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झाली असून, खड्डेमय रस्त्यांमुळे नागरिकांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे. परिणामी वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन तात्काळ रस्ते दुरुस्ती करावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.
वाकड आणि परिसरातून आयटी नगरी हिंजवडी कडे जाणाऱ्या प्रमुख रस्त्यांची दुरवस्था झालेली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झाले आहेत. मुंबई बेंगलोर महामार्गावरील उड्डाणपुलाखाली पावसाळ्यात पाणी साचते ही बाब नित्याची झाली आहे. वारंवार प्रशासनाला पाठपुरावा करूनही अद्यापपर्यंत यावर मार्ग निघाला नाही.
दत्त मंदिर रस्ता, भूमकर चौक रस्ता, वाकड चौक, त्याचबरोबर शनी मंदिर रस्ता या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणत खड्डे पडले असून, सध्या पावसाचे दिवस असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघात होण्याचा धोका संभवत आहे. तसेच सकाळी आणि सायंकाळी मुख्य चौकात प्रचंड वाहतूक कोंडीने नागरिकांना नाहक त्रासास सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे दुचाकी चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
तरी प्रशासनाने या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन सर्वच रस्ते खड्डेमुक्त करून नागरिकांना दिलासा द्यावा व त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका करावी अशी मागणी विशाल वाकडकर यांनी केली आहे.