पिंपरी चिंचवड, शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पुणे: हिंजवडीतील एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीत कामाला असलेल्या संगणक अभियंता तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. महाविद्यालयात झालेल्या वादातून संगणक अभियंता तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची धक्कादायक माहिती तपासात मिळाली आहे.
याप्रकरणी ग्रामीण पोलिसांची गुन्हे शाखा आणि खेड पोलिसांच्या पथकाने कोपरगाव परिसरातील एका तरुणास अटक केली.याप्रकरणी मयूर संदीप दळवी (रा. सराफ बाजार, कोपरगाव, जि. अहमदनगर) याला अटक करण्यात आली आहे. सौरभ नंदलाल पाटील (वय २३, रा. सुरभी साई पंढरीनगर, पिंपळवाडी रस्ता, शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर) असे खून झालेल्या संगणक अभियंता तरुणाचे नाव आहे. पुणे-नाशिक महामार्गावरील सांडभोरवाडी परिसरात वनविभागाच्या मोकळ्या जागेत सौरभ पाटील मृतावस्थेत सापडला होता. तो हिंजवडीतील एका माहिती-तंत्रज्ञानात कामाला होता. २८ जुलै रोजी तो बेपत्ता झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. सौरभवर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन त्याच्या डोक्यात दगड घातल्याचे उघडकीस आले होते.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय अधिकारी सुदर्शन पाटील यांनी गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, खेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने तपास सुरू केला. सौरभच्या खुनामागचे कारण पोलिसांना समजले नव्हते. निर्जन जागेत खून झाल्याने पोलिसांना काही धागेदोरे मिळाले नव्हते. सौरभ आणि आरोपी मयूर कोपरगावमधील एका महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यावेळी एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला होता, अशी माहिती पोलिसांना तपासात मिळाली. पोलिसांनी संशयावरुन आरोपी मयूरला ताब्यात घेतले.
चौकशीत त्याने सौरभचा खून केल्याची कबुली दिली. त्याने सैारभला गाठून त्याच्यावर चाकूने वार केले. त्याच्या डोक्यात दगड घातला. त्यानंतर त्याचा मृतदेह पुणे-नाशिक महामार्गावरील सांडभोरवाडीतील वनविभागाच्या जागेत टाकून मयूर पसार झाल्याचे तपासात उघडकीस आले. सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत सावंत, राजू मोमीन, अतुल डेरे, प्रकाश वाघमारे, दीपक साबळे, विक्रम तापकीर, संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर आदींनी ही कामगिरी केली.