शबनम न्युज | प्रतिनिधी :
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, शरदचंद्र पवार कला आणि वाणिज्य महाविद्यालय डुडुळगाव आळंदी या ठिकाणी वाणिज्य विभागाच्या वतीने प्रेरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथम दिवशी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन, प्रतिमापूजन आणि कु. धनश्री कुडेकर व जागृती देवरे यांच्या स्वागत गीताने झाली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून देतांना वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख प्रा.दिलीप बारी यांनी प्रेरण कार्यक्रमाची भूमिका, उद्देश स्पष्ट करीत महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने शारीरिक, मानसिक दृष्ट्या सशक्त होऊन यशासाठी भरारी घेत आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करावे असे सांगितले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. बी.जी.पानमंद – प्राचार्य ज्ञानवर्धिनी कला आणि वाणिज्य महाविद्यालय, चिखली. यांनी ‘वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणारी कौशल्ये’ या विषयावर भाष्य करतांना वाणिज्य शाखेत पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या संधी कोणकोणत्या क्षेत्रात आहेत या संदर्भात विवेचन करीत व्यक्तीच्या अन्न,वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा बरोबरच शिक्षण ही आधुनिक काळातील अत्यंत महत्वपूर्ण गरज असून महाविद्यालयीन तरुणाईने ‘ टाईम इज लॉस्ट समथिंग इज लॉस्ट’ याकडे दृष्टिक्षेप टाकून मोबाईल संस्कृतीमुळे होणाऱ्या दुष्परिणामाचा आढावा घेतला तसेच विद्यार्थ्यांनी कष्ट,जिद्द, कर्तव्य, आदर आणि प्रामाणिकपणा अंगी जोपासून स्पर्धा परीक्षेकडे मार्गक्रमण करण्याची आवश्यकता विषद केली.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी डॉ. किशोर निकम – उपप्राचार्य डी.वाय.पाटील महाविद्यालय, पिंपरी, पुणे. यांनी ‘करियर इन कॉमर्स अँड मॅनेजमेंट ‘ या विषयावर मनोगत व्यक्त करतांना ज्या कॉलेजमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी बौद्धिक दृष्ट्या सक्षम असतात त्या महाविद्यालयाचे भवितव्य उज्वल असते असे मत मांडले. वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी सी.ए.,आय.सी.डब्ल्यू.ए.,सी. एस., सी.एफ.ए.,जी.डी.सी. अँड ए.,या सारखे विविध कोर्सेस महत्वपूर्ण असून संबंधित कोर्सेस पूर्ण केल्या नंतर बँक,रेल्वे,शासकीय कार्यालये, आय.टी. कंपन्यामध्ये नोकरीची शाश्वती असते.तसेच एम.पी.एस.सी., यु.पी.एस.सी., पी.एस.आय., एस.टी.आय., आर.आर. बी., एल.आय.सी., आय.बी.पी.एस. आणि पी.ओ.या क्षेत्रात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना कशी संधी मिळू शकते या संदर्भात मत व्यक्त केले.
अध्यक्षीय समारोप करतांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी पारंपारिक दृष्टिकोन सोडून प्रोफेशनल व कमर्शियल दृष्टिकोन स्वीकारून हार्डवर्कला स्मार्ट वर्कची जोड देण्याची आवश्यकता स्पष्ट करीत संवाद कौशल्य अवगत करून वाचन,चिंतन व मनन केले पाहिजेअसे सांगितले.
तसेच विद्यार्थ्यांनी व्यवसायाकडे वळतांना मार्केटिंग, लीडरशिप व मॅनेजमेंट इत्यादी स्किल जोपासून POSDCORB या ल्युथर गुलिक यांच्या सिद्धांताचा अभ्यास केला पाहिजे असे मत व्यक्त केले.विद्यार्थ्यांच्या अंगी वक्तशीरपणा, प्रामाणिकपणा, नीटनेटकेपणा, श्रमप्रतिष्ठा, राष्ट्रभक्ती, राष्ट्रनिष्ठा व वैज्ञानिक दृष्टिकोन हे गुण स्वीकारण्याची आवश्यकता व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी जीवन व्यतीत करतांना आपले कर्तत्व समुद्रागत बनवले पाहिजे जेणेकरून कोणालाही आपली उंची आणि खोली मोजता येणार नाही या संदर्भात विविध उदाहरणे देत सखोल मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी मा.श्री. मयूर मुरलीधर ढमाले खजिनदार- श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या प्रसंगी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी गणेश वंदना, काव्य वाचन, व्यक्तिगत नृत्य, सामूहिक नृत्य,पोवाडा इत्यादी कला प्रकार सादर केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.पूजा मिटकरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा.दिपाली ताम्हाणे यांनी मानले.
या कार्यक्रमाला डॉ.पांडुरंग मिसाळ, प्रा. संजीव कांबळे, प्रा. कैलास अस्तरकर, डॉ. छाया जोशी, प्रा. शैला वाळुंज, प्रा. शाहूराज येवते,प्रा. दिपाली सोनवणे प्रा. परमेश्वर भत्तासे, प्रा. विश्वनाथ व्यवहारे,प्रा. सविता मानके, प्रा. यशोदा खुळखुळे, प्रा. प्रेरणा पाटील,प्रा. सोनाली अभंग, प्रा. प्रीती बोऱ्हाडे,शिक्षकेतर कर्मचारी आणि वाणिज्य शाखेतील सर्व विद्यार्थी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली अशी माहिती महाविद्यालयाचे प्रसिद्धी विभाग प्रमुख प्रा. माणिक कसाब यांनी दिली.