शबनम न्युज | मुंबई
दळण-वळणाच्या दृष्टीने भारत भौगोलिकदृष्ट्या सुस्थापित असून जगासाठी लॉजिस्टिक्स हब ठरण्याची क्षमताही आहे. या पार्श्वभूमीवर शिपिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील उद्योग वृद्धीसाठी सहकार्य करण्यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
मित्सुई ओएसके लाईन्स लि. च्या प्रतिनिधी मंडळाने उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी संचालक ज्युनिचिरो ईकेडा, मासारु ओनिशी, दक्षिण आशिया आणि मध्यपूर्व भागाचे प्रभारी अजय सिंग, कॅप्टन आनंद जयरामन, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, देशात विविध क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. थेट परकीय गुंतवणुकीत राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही राज्य अग्रेसर आहे. पुण्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची उभारणी करण्यात येत असून राज्यात सर्वच क्षेत्रात भक्कम पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.