शबनम न्युज | मुंबई
शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर 6 हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेचा शुभारंभ आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी (जि. अहमदनगर) येथे करण्यात आला. राज्य सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि राज्याचे मिळून शेतकऱ्यांना आता दरवर्षी 12 हजार रुपये मिळतील.
प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी एका क्लिकद्वारे राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 1712.02 कोटी रुपये पाठवून योजनेचा शुभारंभ केला. दरम्यान, हा आपल्या जीवनातील ऐतिहासिक व अविस्मरणीय दिवस असल्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत नमूद केले आहे.
उपमुख्यमंत्री तथा तत्कालीन अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सन 2023 24 चा अर्थसंकल्पीय भाषणांमध्ये या योजनेचा शुभारंभ करण्याचे घोषणा केली होती. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर या योजनेला गती दिली. किरकोळ तांत्रिक कारणांमुळे राज्यातील 12 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेपासून वंचित होते. या शेतकऱ्यांसाठी त्यांनी राज्यभरात विशेष मोहिम घेतली आणि 6 लाख शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत वाढविले. या शेतकऱ्यांना आता नमो किसान सन्मान योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे.
नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेले सर्वाधिक शेतकरी अहमदनगर जिल्ह्यातील आहेत नगर जिल्ह्यातील 5 लाख 17 हजार 611 शेतकऱ्यांना 103 कोटी रुपये वितरित करण्यात आले त्या खालोखाल सोलापूर जिल्ह्यातील 4 लाख 54 हजार 40 शेतकऱ्यांना 90 कोटी 81 लाख, कोल्हापूर जिल्ह्यातील 4 लाख 6 हजार 240 शेतकऱ्यांना 81 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत.