शबनम न्युज | छत्रपती संभाजीनगर
राज्य सरकारने मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यासाठी दोन महिन्यांची मुदत वाढवून दिली. या कालावधीत सरकार आम्हाला आरक्षण देईल असा विश्वास आहे, पण दगा फटका होऊ शकतो, हे गृहीत धरून आम्ही गाफील न राहता प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती मराठा आरक्षणाचे नेते मनोज चरांगे पाटील यांनी दिली. ते पत्रकारांशी बोलत होते.
नऊ दिवस उपोषण केल्यामुळे प्रकृती खालावल्याने जरांगे पाटील हे दोन नोव्हेंबरच्या रात्रीपासून शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे. आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. रविवारी सायंकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयातील क्युरेटिव्ह पिटीशन म्हणजे केवळ वरची मलमपट्टी आहे.आम्हाला संपूर्ण ऑपरेशन करून या आजारावर कायमस्वरूपी उपाय हवा आहे. म्हणूनच आम्ही 50% च्या आत सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी आमची मागणी आहे. राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमच्याकडे वेळ मागितला, आम्हीही दोन महिन्यांचा वेळ दिला. सरकारवर विश्वास आहे का? असे विचारला असता हो, सरकार आम्हाला आरक्षण देईल, असा विश्वास आहे. म्हणूनच आम्ही त्यांना दोन महिन्यांची मुदत दिली आहे. असे असले तरी दगा फटका होण्याची शक्यता गृहीत धरून आम्ही गाफिल राहणार नाही, राज्यातील प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचे निर्णय घेतला आहे.