शबनम न्युज | आळंदी
श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे, शरदचंद्र पवार कला व वाणिज्य महाविद्यालय, डुडुळगाव (आळंदी), जि. पुणे येथे राज्यशास्त्र विभागांतर्गत २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिनानिमित्त “भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य ” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना प्रा. कैलास अस्तरकर प्रमुख- अर्थशास्त्र विभाग यांनी कार्यक्रमाचा उद्देश आणि भारतीय राज्यघटनेतील उद्देशपत्रिकेतील मूल्याबाबत थोडक्यात विवेचन केले.
या प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक, प्रा. माणिक कसाब प्रमुख- राज्यशास्त्र विभाग यांनी” भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्य ” या विषयाला न्याय देतांना भारतीय राज्यघटनेत कलम १२ ते ३५ मध्ये भारतीय नागरिकांच्या विकासासाठी मूलभूत अधिकारांचा समावेश केलेला असून अधिकाराबरोबरच कलम ५१ ‘अ ‘मध्ये ४२ वी घटना दुरुस्ती करून १९७६ मध्ये दहा मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे. तसेच ८६ वी घटनादुरुस्ती १२ डिसेंबर २००२ मध्ये करून ११ वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले आहे.सध्या भारतीय संविधानामध्ये एकूण ११ मूलभूत कर्तव्य समाविष्ट असून हे सर्व कर्तव्य कसे महत्वपूर्ण आहेत या संदर्भात मत व्यक्त केले तसेच संविधानातील सर्व मूलभूत कर्तव्यावर कलमवार चर्चा करून सर्व मूलभूत कर्तव्य भारतीय नागरिकांना कशी जबाबदारीची जाणीव करून देतात या संदर्भात विविध उदाहरणांचे दाखले देत मार्गदर्शन केले.प्रत्येक भारतीय नागरिकांनी मूलभूत अधिकार उपभोगतांना मूलभूत कर्तव्यांकडे डोळे झाक न करता भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेतील स्वातंत्र्य,समता, बंधुत्व व न्याय या मूल्यांचा अंगीकार करण्याची आवश्यकता स्पष्ट केली.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हंसराज थोरात यांनी, भारतीय संविधानाची व्यक्तीच्या जीवनातील उपयोगिता व महत्त्व सांगून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान लिहितांना इतर २६ देशाच्या राज्यघटनेचा कसा तुलनात्मक अभ्यास करून त्यातील महत्त्वपूर्ण मूल्य भारतीय राज्यघटनेत समाविष्ट केले याबाबत सविस्तर विवेचन करीत संविधानाच्या माध्यमातून बहुजन समाजाला कशी समता मिळवून दिली तसेच संविधानात कामगार,महिला यांच्यासाठी भविष्य निर्वाह निधी, भत्ते,प्रसूती रजा याची कशी तरतूद केली या संदर्भात मार्गदर्शन केले. देशातील कोणतीही संस्था चालवण्यासाठी जशी नियमावली लागते त्याचप्रकारे देश चालवण्यासाठी सुद्धा काही नियमावली लागते ती नियमावली म्हणजेच भारतीय राज्यघटना होय असे मत व्यक्त केले.
या प्रसंगी संविधानाच्या उद्देशपत्रिकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी, मा. श्री.मयुर मुरलीधर ढमाले, खजिनदार, श्री गजानन महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले.
या कार्यक्रमाला डॉ. पांडुरंग मिसाळ,प्रा. संजीव कांबळे,डॉ. छाया जोशी.प्रा. शाहूराज येवते, प्रा. शैला वाळुंज, प्रा. दिलीप बारी,प्रा. रोहित कांबळे,प्रा.प्रेरणा पाटील,प्रा.सोनाली अभंग,प्रा. सविता मानके,प्रा. दिपाली सोनवणे, प्रा. दिपाली ताम्हाणे, डॉ. प्रीती बुऱ्हाडे, प्रा. पूजा मिटकरी, डॉ. समीना मोमीन, प्रा. पूजा खवले, प्रा. माधुरी चौधरी,मा. श्री. प्रवीण भावे कार्यालयीन अध्यक्ष, सौ. वर्षा ताजणे,कु. नेहा लांडगे,श्री.श्रीकांत कांबळे इत्यादी विभाग प्रमुख,सहाय्यक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, प्रा. परमेश्वर भत्ताशे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. यशोदा आनेराव यांनी मानले. विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमाला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.